पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात शनिवारी 57.58 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात आधीच्या दोन टप्प्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यासाठी तीन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात (28 ऑक्टोबर) 55.68 टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात (3 नोव्हेंबर) 55.70 टक्के मतदान झाले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे 71 आणि 94 जागांसाठी मतदान झाले. तर, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 78 जागा मतदानाला सामोऱ्या गेल्या. अखेरच्या टप्प्यात मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदान सुरू होते.
त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता मतदानाची प्रक्रिया संपल्याने सगळे लक्ष मतमोजणीकडे लागणार आहे. बिहार निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होईल. त्या निकालामुळे बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होणार की जैसे थे स्थिती राहणार ते स्पष्ट होईल. त्या राज्यात सत्तेसाठी प्रमुख लढत सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत आहे.