मुंबई – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
मराठा आरक्षण रद्द झालं याला महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहे. मी शिवसेनेत अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे, शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यामुळे फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यांना आज मनापासून आज आनंद झाला असेल, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
दरम्यान मराठा समाजात मागासलेल्या लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. तरी मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील लढा आजही संपलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू, असं नारायण राणे यांनी म्हटलं.