मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. तर, “आतापर्यंत पालखीचे भोई बनून होतो. आता तसं बनून राहणार नाही.” अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या आमदारांसमोर मांडली आहे.
उद्धव म्हणाले की, “आतापर्यंत पालखीचे भोई बनून होतो. आता तसं बनून राहणार नाही. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार. महाराष्ट्रात आपलंच सरकार बनणार,” त्यामुळे राज्यात निर्माण झालेली सत्ताकोंडी फोडण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी निर्णायक प्रयत्न सुरू केलेअसल्याचे पाहायला मिळत आहे.
आपल्या पक्षाच्या आमदारांना फोडू नये यासाठी मालाडच्या मढ येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. या आमदारांशी उद्धव त्याहकरे यांनी संवाद साधला आहे.
यावेळी ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली. ‘तुमच्याशी बोलता यावं म्हणून केवळ सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा अजिबात प्रश्न नाही,’ असा विश्वास उद्धव यांनी आमदारांना दिला. त्याचबरोबर, युती अजून तुटलेली नाही,’ असंही उद्धव यांनी सांगितलं.