मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत.शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली.राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहिर करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेती व शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता ओला दुष्काळ जाहिर करावा. यासोबतच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील देण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आज त्यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत.शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली.राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहिर करण्याची गरज होती.
— Supriya Sule (@supriya_sule) October 27, 2022
पुढे त्या म्हणाल्या की, आपण सर्वांनी एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, कोविड काळात आपण सर्व लॉकडाऊनमध्ये होतो. त्यावेळी एक व्यक्ती अशी होती की, जी सातत्याने प्रत्येक बांधावर काम करत होती ती म्हणजे शेतकरी. कोविड काळात अनेक गोष्टी कमी पडल्या पण अन्न मात्र कमी पडू दिले नाही. देशातील काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला याचे श्रेय जाते, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
असंवेदनशील हे सरकार आहे. मंत्रालयात येऊन आढावा घेणे, बांधावर जाऊन आढावा घेणे, यापैकी काहीच आपल्याला दिसत नाही. मला असे वाटते की, कोणीतरी तीन महिन्यांचा आढावा घ्यावा. मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्या, मंत्रालयात किती वेळ सरकार होते, फिल्डवर जेव्हा हे सरकार होते तेव्हा ते जनतेसाठी होते की मेळाव्यासाठी होते, कलेक्टरांचा किती वेळा रिव्ह्यू घेतला, पालकमंत्री किती आढावा घेतात असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.
तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे जेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा दर शुक्रवारी मीटिंग घेयचे. सर्व जिल्ह्याचा आढावा घेयचे याचे स्मरण करून देत आता असे काहीच होताना दिसत नाही, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.