नवी दिल्ली – भाजपच्या (bjp) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने छत्तीसगड मधील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी कोणतीही भूमिका बजावली नाही. 2014 ते 2018 या काळात भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या काळात नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत होती. त्यामुळे त्यांनी या समस्येच्या संबंधात आम्हाला काहीही मदत केली नाही. पण आम्ही विश्वास आणि सुरक्षिततेची रणनिती आखून माओवाद्यांना बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी झालो असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel) यांनी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बघेल म्हणाले की, पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कॉंग्रेसची (Congress) सत्ता कायम राहिल्यास ते मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे हायकमांड घेईल. 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे, इतर मागासवर्गीयांवर लक्षणीय पकड असलेल्या बघेल यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर कॉंग्रेस येथे पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.(Chhattisgadh politics)
त्यांच्या सरकारच्या कल्याणकारी योजना शेतकरी, आदिवासी आणि गरीबांवर केंद्रित आहेत. भाजपने त्यांच्या सरकारवर लावलेल्या घोटाळ्यांचे आरोप बघेल यांनी फेटाळून लावले. हे आरोप आपल्या सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने राज्यात अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभाग यासारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. आम्ही आत्तापर्यंत 271 कोटी रूपयांचे शेणखत खरेदी केले पण शेणखरेदीत 1,300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे लोक करीत आहेत हे हास्यास्पद आहे. मद्य प्रकरणात तुम्ही म्हणता की 2,161 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. पण मग भाजप कारखानदारांना अटक करून चौकशी का करत नाही? तुम्ही फक्त बिनबुडाचे आरोप करत आहात असा आरोप त्यांनी भाजपवर केला. गेली तीन वर्ष चौकश्या केल्या पण त्यातून काहीही निष्पन्न करण्यात केंद्रातील भाजप सरकारला अपयश आले असे ते म्हणाले. त्यांचा हेतू फक्त छळ करण्याचा आहे, न्याय सुनिश्चित करण्याचा नाही, ते फक्त निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बघेल यांनी नमूद केले. अमित शहा यांनी आपण छत्तीसगड मध्ये सत्तेवर आल्यास भ्रष्टाचाऱ्यांना फाशी देऊ असे म्हटले आहे. पण आधी त्यांनी रमणसिंह यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर कारवाई करून त्यांना आधी ही शिक्षा द्या असे आव्हानही बघेल यांनी दिले.