पणजी – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यास मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार का घाबरत आहे असा सवाल आम आदमी पक्षाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. दक्षिण गोव्यातील बेनौलिम विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, कोणताही पक्ष जेव्हा ईव्हीएमच्या विरोधात बोलतो तेव्हा भाजप या मशीनच्या समर्थनात का येतो? जर त्यांचा मोदी लाटेवर विश्वास असेल तर ते ईव्हीएमचे समर्थन का करतात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या मागे काही तरी दडले आहे अन्यथा ते ईव्हीएमचे इतके समर्थन का करतील? जर त्यांना पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेवर विश्वास असेल, तर त्यांनी एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेऊन दाखवावी.
ते म्हणाले की, ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर सतत संशय व्यक्त केला जात आहे. हे मी म्हणत नाहीये. हे सामान्य लोकच सांगत आहेत.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही कामावर लोकांकडे मते मागतो. आमच्या पक्षाचा ‘हमी’ हा शब्द इतरांनी चोरला आहे. मान यांनी सांगितले की गेल्या २० महिन्यांत आम्ही पंजाबात ४० हजार लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. पंजाब आणि दिल्लीत वीज मोफत आहे,
येत्या प्रजासत्ताक दिनी पंजाबमधील मोहल्ला क्लिनिक ची संख्या ८०० चा टप्पा गाठेल असे मान यांनी सांगितले. आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी पंजाबमधील मोहल्ला क्लिनिकला भेट दिली आहे. याचा अर्थ, राज्यातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एकाने क्लिनिकला त्याच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी भेट दिली आहे,असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आपचे राज्यसभा सदस्य संदीप पाठक, आपचे गोवा युनिट प्रमुख अमित पालेकर, आमदार वेंझी व्हिएगास हेही या सभेला उपस्थित होते. या वर्षी एप्रिल/मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केजरीवाल आणि मान गुरुवारी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत.