संगमनेर – भाजपच्या अंतःकरणात काय आहे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे विधान केले, यावरून सिद्ध होत आहे. त्यांच्या मनामध्ये छत्रपतींबद्दल नेमके काय आहे. ते जे बोलतात त्यातून त्यांनी गरळ ओकलेली सगळ्यांना दिसत असल्याची टीका आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी शिवरायांवर विधान केले. त्याबद्दल पत्रकारांनी आ. थोरात यांना विचारले.
आ. थोरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपला फक्त आता वाद निर्माण करण्यामध्ये रस आहे. प्रचंड महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्या विषयापासून परावृत्त कसे करता येईल आणि दुसरीकडे कसे नेता येईल, हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणे, हा भाजपचा अजेंडा आहे.
महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊच शकत नाही. उलट महाराष्ट्राची हक्काची गावे आहेत. ती आम्हाला मिळाली पाहिजेत. हा वाद आमचा सुप्रीम कोर्टात चालला आहे. आम्ही लढतो आहोत. त्यामध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. असे असताना फक्त वादविवाद करणे, चर्चा करणे आणि त्यातून लोकांचे लक्ष मूळ विषयापासून दुसरीकडे नेणे, हा भाजपचा उद्देश असतो, तो राबविला जातो आहे, अशी टीका आ. थोरात यांनी या वेळी केली.
जेव्हा राज्यपाल बोलतात काय, त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष बोलतो. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे प्रवक्ते बोलताहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, त्यांचे व्यक्तिमत्त्व माहीत नाही. त्यापेक्षाही महाराष्ट्राचे आमचे मानबिंदू आहेत. जे आमचे सन्मानाचे चिन्ह आहेत. त्यावर कायम आघात करण्याचा प्रयत्न भाजपने केला. मतांकरिता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत, अशीही टीका आ. थोरात यांनी केली.