Radhakrishna Vikhe Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात दौरे करत आहे. यातच आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी विरोध केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू झाले. यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी मुद्द्यावरून बोलायचे असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी केली आहे.
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे. हा वाद वाढू नये यासाठी मंत्री भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत, नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. कारण त्यांच्या भूमिकेमुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही असा संदेश जातो. त्यातून सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होत आहे.”
पुढे ते म्हणाले, “भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.” यावेळी त्यांनी कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील दिली.