आयुष्यात काही तरी करायचे या जिद्दीने चेतना पवार यांनी मशरूमचा उद्योग उभा केला. मशरूमचे महत्त्व समाजात पटवून सांगण्याबरोबरच अभ्यासपूर्वक अत्याधुनिक साधनांचा योग्य उपयोग करून मशरूमला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत काम करून त्या स्वतः सक्षम झाल्या. मशरूमची शेती करण्याचा ध्यास त्यांनी लिलया पेलला आणि राज्यातच नव्हे तर देशभरात या उद्योगात त्यांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली. एवढे करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी आदिवासी विभागातही जागृती करून अनेक महिलांना या व्यवसायातून स्वावलंबी बनविले…
मशरूम पिकाच्या उत्पादनातून मोठी उलाढाल होऊ शकते, हे नाशिकच्या चेतना पवार यांनी सिद्ध केले आहे. मशरूम म्हणजे बुरशीचे फळ. खरे तर हे दुर्लक्षित. पण त्याचे आरोग्याच्यादृष्टीने खूप महत्त्व आहे. ते लोकांना पटवून देण्यापासून चेतना यांच्या कामाची सुरवात झाली. मशरूमचे बियाणे तयार करणे, त्याच्या लागवडीपासून वाढीपर्यंत आवश्यक तंत्रज्ञान समजावून सांगणे आणि त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणे या साऱ्या प्रक्रियेतून त्यांचा हा उद्योग विस्तारत चालला आहे. त्यांचे माहेर विंचुर्णी. माहेरी आईवडीलांकडून झालेल्या संस्कारामुळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या मनात पेरली गेली होती.
पदवी प्राप्त केल्यावर त्यांचे लग्न झाले. नगर जिल्ह्यातील लोणी सासर. पती किरण केमिकल इंजिनिअर. गावातच राहून काही उद्योग करण्याचे त्यांनी ठरविले. त्यातून आळिंबी (मशरूम) पिकाचा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी लागणारे बियाणे पुण्यातील कृषी महाविद्यालयातून आणावे लागायचे. त्यात जाण्यायेण्याचा खर्च, शिवाय उशिर लागायचा. मग ते स्वतःच बियाणे तयार करायला लागले. बियाणे चांगले असल्याचा विश्वास लोकांनी व्यक्त केला. छोट्या व्यवसायात रुपांतर झाले. त्यानी दिलेल्या प्रोत्साहनामुळे चेतना या उद्योगात आल्या. त्यांनी सर्व प्रकारचे आवश्यक प्रशिक्षण घेतले. बियाणे तयार करणे, त्याची विक्री करणे, लागवड करण्यापासून मार्केटिंगपर्यंतचे सारे तंत्र आत्मसात केले. बियाणे तयार करण्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी यासारखा कच्चा माल लागतो, असे त्यांनी सांगितले.
मशरूमला खूप मागणी आहे. मात्र, त्यानुसार पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे या व्यवसायात मोठी संधी आहे, असे त्या सांगतात. मशरूमचा व्यवसाय अगदी तीन बाय सहा एवढ्या छोट्या जागेतही करता येतो. कमी भांडवलात अवघ्या 21 दिवसांत उत्पन्न मिळवता येते. एका वेळी मशरूम लागवड केल्यानंतर अठराव्या दिवसापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. त्यानंतर पुढील तीन दिवसांत तीनदा उत्पादन घेता येते. मशरूमला तीनशे रुपये किलो दर आहे. त्या तुलनेत उत्पादन घेण्यासाठीचा खर्च कमी आहे.
दरमहा मोठी मागणी असल्याने तेवढा अपेक्षित पुरवठा होत नाही. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीने कष्ट घेतले तर महिला या व्यवसायातून नक्कीच चांगले उत्पन्न मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. व्यवसाय स्थिर होण्यासाठी आणि बाजारपेठेच्या दृष्टीने त्यांनी पतीच्या मदतीने नाशिकला काम करण्याचे ठरविले. तिथे त्यांनी टिश्यू कल्चर लॅब सुरू केली. बियाणे तयार केले. आदिवासी महिला व शेतकऱ्यांना मशरूम पिकाविषयी पूर्वीपासूनच माहिती होती.
त्या भागात जंगलात नैसर्गिकरित्या पावसाळ्यात मशरूम उत्पादन व्हायचे. मात्र, त्याचे महत्त्व सांगून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग या दृष्टीने चेतना यांनी या भागात मोफत प्रशिक्षण दिले. त्यांना कमी खर्चात उत्पादन साहित्य व बियाणे दिले. उत्पादित मशरूम योग्य दराने खरेदी करून त्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून दिला. या महिलांना दिवसाला 10 ते 15 किलो मशरूम उत्पादन मिळते. रोजच्या रोज मशरूमपासून महिलांना पाचशे ते सहाशे रुपये मिळतात.
मशरूममध्ये मटण व चिकनइतकेच प्रोटिन, व्हिटॅमिन असते. विशेषतः बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिनसाठी आणि कुपोषणमुक्तीसाठी मशरूम खूपच उपयुक्त असते. मधुमेहातही त्याचा उपयोग होतो. मटण, चिकन पचायला जड असते. परंतु, मशरूम पचायला हलके असते, अशी माहिती त्यांनी दिली. या गुणधर्मांमुळे आठवड्यातून एकदा तरी मशरूमची भाजी खावी, असे त्या सांगतात.
एरवी मशरूम सहजरित्या खाल्ले जात नाही. म्हणून चेतना यांनी काही प्रक्रिया करून मशरूमचे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या दृष्टीने म्हैसुरच्या केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन केंद्रातून प्रशिक्षण घेतले. त्यामुळे चेतना यांनी मशरूमची बिस्किटे, सूप पावडर, रोल, समोसा, पुलाव, पापड, वडी, वाळवणीचे पदार्थ, न्यूडल्स असे विविध पदार्थ उत्पादित करणे सुरू केले. मशरूम आणि उत्पादित पदार्थं विविध ठिकाणच्या प्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहचविले. मशरूमच्या सुमारे दोन हजार जाती आहेत. मात्र, त्यापैकी धिंगरी (ऑइस्टर) व बटन मसरूम या दोन जाती आपल्याकडे चांगल्या होतात. त्यात काही औषधी गुणधर्मही
आहेत. चेतना यांच्या केंद्रात यावरही संशोधन सुरू आहे. माणदेशी फाउंडेशनच्या प्रशिक्षक म्हणून त्या काम पाहतात.
महिलांसोबत काम करायला आवडते. माणदेशीमुळे या उद्योगाची फळी निर्माण करण्यास मोठी मदत झाल्याचे त्या सांगतात. रोज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत त्या व्यस्त असतात. त्यांच्या लॅबमध्ये चार महिला काम करतात. लॅबमधील कामावरील नियंत्रणापासून उत्पादन, प्रक्रिया, मार्केटिंगपर्यंत त्यांचे काम अव्याहतपणे सुरू राहते. त्यांनी उत्पादित केलेले मशरूम व इतर पदार्थ सिद्धार्थ मशरूम या ब्रॅंन्डने देशभर जातात. त्यामुळे नाशिक द्राक्षासाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच ते मशरूमसाठी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर केवळ मशरूमच्या खाद्यपदार्थांचे एक हॉटेल सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.