“झाली का तयारी?’ या प्रश्नात जीवनांचे विविध अर्थ लपलेले आहेत. या सर्व तयारींसाठी, अवस्थांसाठी, आपली मानसिकता बदलती असते. ही तयारी ज्याची त्यालाच करावी लागते. मदत जरूर मिळते, पण मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते. यामध्ये भौतिक गोष्टी बऱ्याच असतात. या तयारीसाठी बरेचदा वेळही मिळतो किंवा आपण काढतो; पण देवाचं बोलावणं अचानक येतं. तिथं कशाचीही तयारी करावी लागत नाही. देव तुम्हाला क्षणभराचाही वेळ देत नाही. सर्वकाही इथंच सोडावं लागतं! फक्त चांगलं कर्म बरोबर येतं, पण त्याचा विचार आपण करतच नाही.
‘झाली का तयारी?’ या प्रश्नाला वेगवेगळ्या पार्श्वभूमीनुसार वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. या तीन शब्दांच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे संपूर्ण मानवी जीवनकहाणी आहे. एकदा योगासनांच्या वर्गात वर्ग सुरू असताना सरांनी विचारले की, “जर या क्षणी तुम्हाला मुंबईला जायचे आहे, तर काय तयारी कराल? लगेच निघायचे आहे?’ सारा वर्ग क्षणभरात अवाक् झाला. काय बरोबर न्यावं! काय सोडावं! अनेक प्रश्नचिन्हं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होते.
सर मात्र सर्वांची होणारी तराबंळ निरखत होते. माझी मैत्रीण जरा स्थिर विचारांची आहे. ती लागलीच म्हणाली, “सर सर्वांत पहिले तर मी माझी सारी औषधं बरोबर घेईन. कारण तब्येत चांगली असणं सर्वांत महत्त्वाचं आहे. आरोग्यम् धनसंपदा!’ सर हसले आणि म्हणाले, “आणखी कोण?’ सर असा प्रश्न विचारतं होते आणि प्रत्येकजण काही ना काही उत्तर देत होते! एकेकाचं उत्तर ऐकून सर मिश्किलपणे हसत होते. “झाली का तयारी?’ असा शेवटचा प्रश्न विचारून क्षणभर चुप्प झाले.
सर्वांची उत्तरं थोड्या फार फरकाने योग्य होती. सर म्हणाले, “ऐका. देवाकडे असंच अचानक जावं लागतं! कशाचीही तयारी करावी लागत नाही. देव तुम्हाला क्षणभराचाही वेळ देत नाही. सर्वकाही इथंच सोडावं लागतं! फक्त चांगल कर्म बरोबर येतं. त्याचा विचार आपण करतच नाही. भौतिक गोष्टींचा विचार आपण करत असतो. असो! असेच देवाकडे त्यानं बोलावलं की जावं लागतं. त्यासाठी मनाची तयारी करा.
ओमकार प्राणायाम याने मन स्थिर होतं! त्याची तयारी करा.’ खरंच आहे… ही तयारी आपण कुणीच करत नाही। साधं चार दिवस कुठे गावाला जायचं तर किती तरी दिवस आधीपासून आपण तयारी करतो. पण शेवटचं गंतव्य! त्याची तयारी नाही करत! “अचानकच गेले हो! वय नव्हत जाण्याचं! त्यांच्या जाण्याची अशी वेळ येईल अशी कल्पनाच नव्हती, मन तयार नाही या गोष्टी स्वीकारायला’ अशा अनेक प्रसंगी आपण तयारी या शब्दाचा वापर करतो. सामानाची तयारी, मनाची तयारी असे अनेक शब्दप्रयोग आपण वापरतो.
“झाली का तयारी?’ हा प्रश्न लग्नासंदर्भात फार आनंदानं विचारला जातो. “नाही हो अजून, खूप व्हायची आहेत कामं.’ उत्साहानं आणि आनंदानं ही तयारी सुरू असते. कपडे, दागिने, वस्तू इत्यादी इत्यादी.. वेळ पुरत नाही, पैसा पुरत नाही आणि शेवटपर्यंत तयारी संपत नाही. तसंही आजकाल चार-चार दिवसांची लग्नं असतात. त्याची तयारी तर खूपच असते. भौतिक आणि दिसण्याची सर्व तयारी होते. होत नाही ती किंवा महत्त्वपूर्ण वाटत नाही ती तयारी म्हणजे मानसिक तयारी. नवीन वातावरण, नवे नातेसंबंध यांच्याशी योग्य तो समन्वय साधण्याची तयारी! ती मात्र कोणीच करत नाही. त्याविषयी बोललं पण जात नाही. खरी तयारी सोडून बाकी तयारी जय्यत झालेली असते.
वास्तविक हीच तयारी खूपच महत्त्वाची असते मुलीसाठी. नवीन वातावरणात होणारा बदल. जरी आधी प्रियकर असला तरी नातं बदलतं.
पत्नी वगैरे नाही पण अधिकाराची भावना प्रबळ असते. मुलींप्रमाणे मुलांना त्याच्या घराच्या लोकांना घरात नव्यानं येणाऱ्या सुनेला सांभाळून घ्यायची तयारी करावी लागते. आमची सुन आम्हाला मुलीसारखीच आहे, या वाक्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. ते होऊ शकत नाही. त्यापेक्षा जे नातं आहे तेच नातं उत्तमरीत्या फुलवणं असं म्हणून त्याचीे आपल्या मनाची तयारी करावी. ही तयारी उभयपक्षी हवी.
झाली का तयारी? डॉक्टर आलेले आहेत, हा प्रश्न सुतिकागृह किंवा नर्सिंग होममध्ये नेहमी विचारला जातो. ही पण एक तयारी! नवीन बाळाच्या आगमनाची तयारी. आतलं म्हणजे ओटीतील वातावरण खूप आनंदाचं असतं. पेशंट थोडासा घाबरलेला असतो.
पहिली वेळ असेल तर अधिकच. बाहेरचे वातावरण खूप आनंदाचे असते. आजी-आजोबा यांच्या चेहऱ्यावर एक अधिरेपणा असतो. कान सगळे आतल्या आवाजाकडे लागलेले असतात. त्याचा आवाज कानावर पडताच, काय झालं डॉक्टर? मुलगा की मुलगी? हलक्या आवाजात पण विचारतो बाळाची आई कशी आहे? येणारा जीव सगळी नाती आपल्या सोबत घेऊन येतो. ही पण तयारी तेवढीच महत्त्वाची असते. यापेक्षा वेगळं वातावरण वेगळ्या प्रकारच्या संदर्भात देखील असतं. कधी एखादा अपमान कधी हृदविकारचा झटका! याही वेळी हाच प्रश्न विचारला जाता. प्रसंगानुरूप डॉक्टरांचं वागणं, समजावणं बदलतं, म्हणूनच झाली का तयारी? या प्रश्नात जीवनांचे विविध अर्थ आहेत.
या सर्व तयारींसाठी, अवस्थांसाठी, आपली मानसिकता बदलती असते. ही तयारी ज्याची त्यालाच करावी लागते. मदत जरूर मिळते. पण मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते.शेवटी उरते ती फक्त एक तयारी. झाली का तयारी? बाहेर घेऊया त्यांना? आता घरात कल्लोळ असतो. रडारड असते. फक्त आपण शांत असतो. आपल्याला आज काहीच तयारी करायची नसते. आपल्यासाठीची तयारी इतर करत असतात. जसं जन्माला येतांना काहीच सामानाची तयारी आपल्याला करावी लागत नाही. तसंच निर्वाणाचीही तयारी आपल्याला काहीच करावी लागत नाही. यावेळी उलट आपल्याला काय आवडतं ते आठवून आर्वजून केलं जातं! “अरे त्यांना ना मोगऱ्याची फुलं फार आवडायची’ असं कुणी म्हटलं की लागलीच धावपळ करून शेवटासाठी मोगऱ्याचा हार शोधला जातो.
मानली तर सगळी मजा असते. एक गोष्ट मात्र नक्की, वाढत्या वयात आपल्यानंतर कोणाला काय द्यावे यासाठी मृत्युपत्राची तयारी मात्र जरूर करावी. म्हणूनच की काय? योगा क्लासमध्ये विचारल्या गेलेला प्रश्न विचार करायला लावणारा आहे. त्या एका प्रश्नाने इतके सारे रामायण विचारांतून उद्भवले. खरंच आहे. साधासा प्रश्न झाली का तयारी? रोजच्या दिनचर्येत कितीतरी वेळा हा प्रश्न कोणी आपल्याला विचारत असतं, नाहीतर आपण कोणाला तरी विचारत असतो. पण या एकाच प्रश्नाचे किती ठिकाणी किती वेगळे अर्थ आहेत ना?
– अनामिका