भोपाळ :- आजवर आठ चित्त्यांचा विविध कारणांमुळे मृत्यु झाला असला तरी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्येच चित्ते राहतील आणि हा प्रकल्प यशस्वी होईल, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
यादव म्हणाले, आफ्रिकेतून आलेले चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेत आहेत. या दरम्यान थोडे विपरीत घडणे अनपेक्षित नाही. शिवाय दोन चित्ते प्राण्यांच्या एकमेकांच्या शिकारीत मरण पावले आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह इतर तज्ज्ञांच्या संपर्कात आहोत. आमची टीम तिथे भेट देणार आहे. त्यामुळे एकही चित्ता स्थलांतरित केला जाणार नाही आणि सर्व चित्ते कुनोमध्येच राहतील.
चीता प्रकल्पाबाबत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर यादव यांचे वक्तव्य आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका तज्ज्ञाने सांगितले आहे की, या आठवड्यात दोन नर चित्त्यांच्या मृत्यूमागे रेडिओकॉलरमुळे होणारा सेप्टिसीमिया हे संभाव्य कारण असू शकते. तर दुसऱ्याने म्हटले आहे की केवळ पोस्टमार्टम अहवालच अचूक असू शकतात.
दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या सूरज या नर चित्ताचा शुक्रवारी श्योपूरमधील केएनपी येथे मृत्यू झाला, तर दुसरा नर चित्ता तेजस मंगळवारी मरण पावला.
दक्षिण आफ्रिकेतील चित्ता तज्ज्ञ व्हिन्सेंट व्हॅन डर मर्वे यांनी सांगितले की, रेडिओ कॉलर अत्यंत ओल्या स्थितीमुळे संसर्गास कारणीभूत ठरत आहेत आणि कदाचित हेच या चित्त्यांच्या मृत्यूचे कारण असावे. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दोन चिते आणि तीन छाव्यांसह मृत चित्त्यांची संख्या आठ झाली आहे.
भारतातील प्रोजेक्ट चिताच्या भवितव्याबद्दल विचारले असता, मर्वे आशावादी वाटले. ते म्हणाले, आताही भारतातील चित्यांची 75 टक्के लोकसंख्या जिवंत आणि निरोगी आहे. त्यामुळे जंगली चित्ता पुनरुत्पादित करण्यासाठी सामान्य मापदंडांच्या अंतर्गत मृत्यूसह सर्व काही अद्याप योग्य दिशेने आहे.
कुनो नॅशनल पार्कचे संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही चित्त्यांचे शवविच्छेदन अहवाल भोपाळमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. मात्र, यासंदर्भात तपशीलवार विवेचन येणे बाकी आहे.
शुक्रवारी मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह म्हणाले होते की, चित्ता सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. मरण पावलेली तीन पिल्ले जन्मापासूनच कुपोषित होती तर इतर मृत्यू हे प्राण्यांमध्ये सामान्य असलेल्या भांडणामुळे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका भव्य समारंभात गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी पाच मादी आणि तीन नरांसह आठ नामिबियन चित्ता कुनो नॅशनल पार्कच्या एन्क्लोजरमध्ये सोडण्यात आले होते, या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आले होते. चार छाव्यांच्या जन्मानंतर एकूण चित्यांची संख्या 24 झाली होती मात्र आठ मृत्यूनंतर ही संख्या आता 16 वर आली आहे.