राहाता – गेल्या अनेक वर्षांपासून नगर- कोपरगाव महामार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊनही काम सुरू होत नसल्यामुळे दुरावस्था झालेल्या या महामार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महामार्गाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोते व पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव ते मनमाड या महामार्गाची दुरावस्था कायम आहे. परिणामी या महामार्गावर हजारो निरपराध लोकांचे बळी गेले. शालेय विद्यार्थी तसेच सामान्य जनतेला या रोडवरून जाणे कठीण झाले आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देखील नगर -कोपरगाव महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे. परंतु अनेक वर्षापासून महामार्गाच्या कामाबाबत कुठलाही निर्णय घेतला जात नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील या प्रश्नाबाबत लवकरच भेट घेणार असून, हा महामार्ग तत्काळ दुरुस्त करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कैलास भुजबळ, राहुल देशमुख, कुणाल सांबारे, विकी काबंळे, राजेंद्र कटारे, दामोदर उमाप, भिमा गाजरे, साई सोनवने, यश कोते, प्रशांत ठोंबरे, सुनील देशमुख, ज्ञानेश्वर जगदाळे, प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, आदी मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.