धनादेश देणाऱ्यांना महत्त्वाची माहिती पुन्हा द्यावी लागणार
मुंबई – रिझर्व्ह बॅंक आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया धनादेश देण्याची पद्धत अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पद्धतीला धनादेशासंदर्भातील पॉझिटिव्ह पे सिस्टम असे संबोधले जाते. या व्यवस्थेअंतर्गत धनादेश देणाऱ्यांना 50 हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचा धनादेश असल्यानंतर बॅंक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारा पुन्हा महत्त्वाची माहिती विचारू शकते.
ज्यांना अशा प्रकारची पद्धत स्वीकारायची आहे, त्यांना स्वेच्छेने अशी पद्धत स्वीकारण्याचा पर्याय देण्याचा विचार चालू आहे. आवश्यकता भासल्यास बॅंका पाच लाखांवरील रकमेच्या धनादेशासारखी अशी पद्धत बंधनकारक करू शकतात.
या पद्धतीनुसार धनादेश देणाऱ्याला नंतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तारीख, ज्यांना धनादेश दिला आहे त्यांचे नाव आणि धनादेश कोणत्या बॅंकेचा आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल. या माहितीचे क्रॉस चेकिंग केल्यानंतर संबंधित धनादेश वठेल. मात्र यामध्ये काही विसंगती आढळल्यानंतर दोन्ही बॅंका चौकशी करतील. पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया या संदर्भात यंत्रणा विकसित करीत असून एक जानेवारीपासून ती बॅंकांना उपलब्ध करण्यात येईल.
बॅंकांना तयारीची सूचना
केवळ तीन महिन्यांमध्ये अशी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे बॅंकांना तयारी करण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती बॅंकांनी आपल्या ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करावी असे सांगण्यात आले आहे.