उद्योजकांचे रिझर्व्ह बॅंकेला फेरविचाराचे आवाहन
नवी दिल्ली – कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त करंट अकाउंट म्हणजे चालू खाती उघडता येणार नाहीत असे सर्क्युलर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात काढले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयावर उद्योग महासंघाने असमाधान व्यक्त केले असून या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती केली आहे. यामुळे बॅंकांना सध्याच्या खातेधारकांना सेवा देण्यात अडचणी येतील व अकार्यक्षमता आणि दिरंगाई वाढेल, असे उद्योग महासंघाचे म्हणणे आहे.
उद्योग महासंघाने म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेचा उद्देश चांगला आहे. मात्र बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, गृहवित्त कंपन्यांकडे असलेल्या सध्याच्या खात्याच्या कामकाजावर परिणाम होईल. यामुळे काम वाढेल, अकार्यक्षमता वाढेल, दिरंगाई वाढेल, सेवाचा खर्च वाढेल. कोणत्या ग्राहकांकडे किती रक्कम जाते, याची शहानिशा करण्यासाठी एखादी दुसरी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे.
मोठ्या रकमेच्या व्यवहाराकडे लक्ष दिले तरी रिझर्व्ह बॅंकेचा उद्देश सफल होऊ शकतो. मात्र सरसकट एकापेक्षा जास्त करंट अकाउंट काढण्यावर बंधन घालने बरोबर होणार नाही. उद्योग महासंघाने रिझर्व्ह बॅंक सध्याच्या परिस्थितीत सक्रिय भूमिका निभावत असल्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. मात्र लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने आणखी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
पुढील आठवड्यातील पतधारेणात व्याजदर कपातीची शक्यता नसली तरी रिझर्व्ह बॅंकेने इतर उपाययोजना कराव्यात असे महासंघाने म्हटले आहे.
काही खातेधारकांना वगळावे
उद्योग महासंघाने म्हटले आहे की, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, ब्रोकर्स, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, गृहवित्त संस्था अशा ग्राहकांवर आगोदरच बरीच नियंत्रणे आहेत. त्यामुळे या ग्राहकांना या नव्या नियमापासून वगळण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्या आणि बॅंकांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.