20 मार्च 1927 या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला. हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी आजन्म लढा दिला. त्यातीलच एक महत्वाचा लढा म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
त्याकाळी असलेल्या अमानवीय जातीव्यवस्थेमुळे जनावारांपेक्षा देखील हालाखीचे जीवन अस्पृश्यांना जगावे लागत होते. त्यांचा दोष इतकाच की, त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीमध्ये झाला. वर्षानुवर्षे अन्याय सहन करत आलेल्या आपल्या समाजाला या अन्यायातून मुक्त करणं हे त्यावेळी मोठं आव्हान होतं.
उच्चवर्णीयांकडून वेळोवेळी मिळणारी अपमानास्पद वागणूक, गुलामगिरी, एवढचं काय तर निसर्गाची देणगी म्हणजे ‘पाणी’ ते देखील त्यावेळी अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा साधा अधिकार नव्हता.
भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास देखील परवानगी नव्हती.
ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला. त्यामध्ये सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 रोजी ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला. परंतु या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.
सत्याग्रहासाठी रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर निवडण्यात आले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख देखील यामध्ये सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रहाच्या दरम्यान बाबासाहेबांना मदत करत होते.
1927 साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती, सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. आंबेडकर सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी प्यायले आणि त्यानंतर तिथे जमलेले सर्व लोक त्या तळ्यातील पाणी प्यायले. त्यावेळी सुमारे ३ हजारांहून अधिक लोक ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते.
चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.”