मुंबई – विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आज अभूतपूर्व असा गोंधळ पाहावयास मिळाला. राज्यात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याची टीका केली जाते आहे.
सकाळी कामकाज सुरु होण्याच्या काही वेळापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार धक्काबुकी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कामकाज सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे दिसले.
कथित कोविड घोटाळ्याविरोधात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. ते देखिल काही काळ तिथे थांबले आणि बॅनरवरचा मजकूर त्यांनी वाचला.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधीपक्षातील आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहून विविध घोषणा देत आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत होते. आज आम्ही सर्व आमदारांनी एकत्र येत आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेत आंदोलन करत होतो. यावेळी काही सदस्य पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच अर्वाच्च भाषेत बोलण्यात आले. विधीमंडळ परिसरातले त्यांचे वर्तन निंदनीय आणि अशोभनिय होते, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी दिली.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शिवीगाळ केल्याचा आरोप केला. मिटकरी म्हणाले, सत्ताधारी आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनीही आंदोलनाला सुरूवात केली. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आजचा प्रकार हा जाणीवपूर्वक घडवून आणला आहे. आंदोलनादरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आमच्या घोषणा दाखवण्यात आल्या. त्यातून सत्ताधाऱ्यांना त्यांची प्रतिमा मलिन झाल्याची भीती निर्माण झाली असावी. या प्रकाराबद्दल एकनाथ शिंदेंकडे तक्रार केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
“विधीमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत होते. यावेळी विरोधकांकडून पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा देण्यात आली आणि हीच घोषणा सत्ताधाऱ्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला.”
– अजित पवार, विरोधी पक्षनेते