हैदराबाद – तेलंगण विधानसभेतील कॉंग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी कॉंग्रेस पक्षाच्या त्याग करून तेलंगणा राष्ट्रीय समितीत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाला तेलंगण विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली. ही जनादेशाची हत्या आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. तथापि, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या पक्षांतराचे समर्थन केले आहे.
कॉंग्रेस आमदारांचा पक्षप्रवेश हा कायदेशीर असून त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे पालन केले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने हे पक्षांतर आमिषे दाखवून घडवून आणल्याचा आरोप चंद्रशेखर राव यांनी फेटाळला. कॉंग्रेस पक्षाला भवितव्य उरले नसल्याने त्यांचे आमदार अन्य पक्षात जात आहेत. ही प्रक्रिया केवळ तेलंगणमध्येच नव्हे तर इतरत्रही सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेसने इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही चंद्रशेखर यांनी दिला.
कॉंग्रेस सोडलेले आमदार ही लहान मुले नव्हेत. त्यांना त्यांचे हित योग्यप्रकारे कळते. त्यांना कोणीही पळवून नेऊ शकत नाही. तेलंगण राष्ट्र समितीचे कार्यक्रम व धोरण पटल्यामुळेच आपण पक्षांतर करीत आहोत, असे या आमदारांनी स्पष्ट केले असल्यामुळे त्यांना आमिषे दाखवून पळविल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचे सत्ताधारी पक्षाने स्पष्ट केले आहे.