नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांत अनुत्पादक मालमत्तेमुळे अलाहाबाद बॅंकेला तोट्याचा सामना करावा लागला होता. मात्र, बॅंकेने आक्रमकपणे कर्ज वसुली केली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने बॅंकेला भांडवली मदत केलेली आहे. त्यामुळे बॅंकेची कार्यक्षमता सुधारत असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बॅंकेला नफा होण्याची शक्यता असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक एस मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले.
बॅंकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, बॅंकेला 2016-17 मध्ये 279 कोटी रुपयांचा तर2017-18 मध्ये 4,674 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र आता परिस्थिती सुधारली असून बॅंकेवरील निर्बंध रिझर्व्ह बॅंकेने कमी केले आहेत. त्यामुळे आगामी काळात बॅंक कर्जपुरवठा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅंकेचे उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.