माधव विद्वांस
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील झाबुआ जवळील भाबरा गावी 23 जुलै 1906 रोजी झाला. पंडित सीताराम तिवारी व जगदानीदेवी यांचे ते पुत्र. त्यांच्या वडिलांनी त्यांना संस्कृत अध्ययनासाठी वाराणसी येथे ठेवले होते. तेथे ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात ओढले गेले.
वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांना पकडण्यात आले. त्यांना मॅजिस्ट्रेट खारेघाट यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी लहान चंद्रशेखरला त्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात केली- तुझे नाव काय आहे? माझे नाव आझाद. तुझ्या वडिलांचे नाव काय? माझ्या वडिलांचे नाव स्वतंत्र. तुझे घर कोठे आहे? माझे घर जेल आहे. या उत्तराने मॅजिस्ट्रेट चिडले व या छोट्या मुलाला 12 फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांच्या शिक्षेमुळे आझादांना अपमानित झाल्यासारखे वाटले व त्यांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला.
अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला व ते क्रांतिकारक बनले. चंद्रशेखर आझाद वयाच्या 17 व्या वर्षी “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारक पक्षामध्ये सामील झाले. सॅंडर्स खून, सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट, बॉम्बने रेल्वे उडविण्याचा प्रयत्न तसेच काकोरी कट या सर्व प्रकरणांत ब्रिटिश पोलिसांना ते हवे होते. काकोरी प्रकरणानंतर ते भूमिगत झाले. “मी जिवंतपणी ब्रिटिश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझादांची प्रतिज्ञा होती.
काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत असताना उदासी महंताचा मठात येऊन त्यांचे चेला झाले होते. परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून मठातून बाहेर पडले. त्यानंतर झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तुलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
27 फेब्रुवारी 1931 चा तो काळा दिवस उजाडला. पोलिसांना त्यांचा सुगावा लागला होता व त्यांची घेराबंदी सुरू झाली. त्यावेळी ते अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधीक्षक नॉट बॉबर याने तेथे येताक्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी प्रत्युत्तर देऊन नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हात निकामी केला.
त्यांच्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा त्यांनी पिस्तूल आपल्या मस्तकावर ठेवून चाप ओढला! तत्क्षणी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. मनात योजल्याप्रमाणे ते जिवंत हाती लागले नाहीत. फक्त वयाची 25 वर्षे ते जगले, पण विजेच्या लखलखाटा सारखे
चमकून गेले.