मुंबई: एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला सत्ताधाऱ्यांचा इगो आडवा येतोय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सध्या सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नसून आम्ही सत्तेत असताना विरोधकांना विचारात घेत होतो, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी “लॉक आहे की अनलॉक अजून काळात नसून सरकारमधी मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाऊनमध्ये कडक नव्हतं त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? सरकार मुंबईत मूर्खपणाचे निर्णय घेतंय आहे. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला असून चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे. सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं.