हिंजवडी – पुणे महापालिका हद्दीलगत असलेल्या चांदे (ता. मुळशी) गावच्या गायरान जागेवर प्रस्तावित असलेला पुणे महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ नये, या प्रकल्पाला चांदेगावच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारने बळजबरीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
प्रास्तावित ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी कचरा प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शविला. चांदे येथील गट नंबर 89 मध्ये सरकारी गायरान आहे. सदरच्या गायरानातील 20 हजार चौरस मीटर जागा पुणे महापालिकेने सूस येथील ओला कचरा प्रकल्प स्थलांतरित करून चांदे येथील गायरानात करण्यासाठी पीएमआरडीएकडे मागितली आहे. याबाबतचा पत्रव्यवहार ही जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकार्यांच्या मार्फत चांदे ग्रामपंचायतीला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर चांदे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन गावचा एकमुखी विरोध दर्शविला आहे.
ग्रामसभेने मंजूर केलेला हा विरोधाचा ठराव सर्व शासकीय यंत्रणांकडे पाठविला असून सरकारने बळजबरीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या गायरान जागेमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने लाखो देशी, विदेशी वृक्षांची लागवड केलेली आहे. मूळात ‘पीएमआरडीए’चा प्रस्तावित विकास आराखडा अंतिम झालेला नसताना ग्रामपंचायतीला जागा हस्तांतरित करण्याचे पत्र आलेले आहे. मग हस्तांतर प्रक्रिया लगेच कशी सुरू केली. शिवाय ती गायरानाची जागा आहे. गावकर्यांनी अनेक वर्षांपासून ती मोठ्या कष्टाने जतन करून ठेवली आहे. त्या जागेवर ग्रामपंचायतीला विविध सार्वजनिक विकासासाठीचे प्रकल्प उभे करायचे आहेत. त्यामुळे ही जागा महापालिकेला हस्तांतरित करणे चुकीचे आहे. अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
प्रकल्पामुळे शेती, पाण्याचा प्रश्न होणार गंभीर
गायरान क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरात बागायती शेती, सरकारी शाळा तसेच इंदिरा आवास घरकुल योजना व लोकवस्तीही आहे. या गायरान क्षेत्रालगत नैसर्गिक ओढा असून, तो मुळा नदीला मिळतो. चांदे, नांदे, लवळे, हिंजवडी, माण गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना मुळा नदीच्या काठावर असून, त्या ठिकाणी हा ओढा मिळालेला आहे. या घन कचरा प्रकल्पामुळे नदीचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत. शेतीच्या पिकांना हानी होणार आहे. जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण होणार आहे.
गावच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी याच गायरान जागेवर आरोग्यकेंद्र, भाजीमंडई, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची टाकी, शाळा, सार्वजनिक उद्यान, व्यायामशाळा तसेच अन्य उपक्रमांच्या बांधकामांसाठी आम्ही ग्रामस्थानी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून शासनाकडे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्याचे अंतिम मान्यतेचे प्रस्ताव शासनाकडे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला गावच्या प्रस्तावित विकासकामांसाठी गरजेची आहे.
– अशोक ओव्हाळ, सरपंच चांदे.
हा कचरा प्रकल्प पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहे. त्याची शिक्षा आम्हाला कशासाठी देता? पुणे महापालिकेने त्यांचा कचरा प्रकल्प त्यांच्याच हद्दीत उभारला पाहिजे. किंवा नव्याने महापालिकेत समावेश केलेल्या गावांपैकी ज्या गावांना गायरान क्षेत्र आहे, त्यातीलच एखाद्या गावाचा या प्रकल्पासाठी विचार करावा. आमच्या गावामध्ये बळजबरीने हा प्रकल्प आणल्यास आम्ही मोठे आंदोलन उभारू.
– समस्त ग्रामस्थ, चांदे.