मुंबई – पुन्हा ४०० जागा जिंकून सत्तेत येण्याचे लक्ष्य ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतावर विशेष फोकस ठेवला आहे. अन्य राज्यांवरही त्यांचे लक्ष आहे. त्यात ४८ जागा असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. येत्या १० एप्रिलपासून मोदी महाराष्ट्रात निवडणूक अभियान सुरू करणार आहेत.
राज्यात त्यांच्या तब्बल १८ सभा होणार आहेत. याच सुमारास एबीपी न्यूज आणि सी-वोटर यांनी राज्यात सर्वेक्षण केले आहे. त्याचा भाजपला फटका बसू शकतो कारण साधारण एक महिन्यांपूर्वी भाजप पुढे असल्याचे दिसत होते. मात्र आता पक्ष मागे पडत असल्याचे आढळून येते आहे.
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडिए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या दोघांना समान म्हणजे ४१ टक्के मिळत असल्याचे दिसते आहे. मागच्या महिन्यात एनडीएच्या खात्यात ४३ टक्के मते जातील असा अंदाज वर्तवला गेला होता.
तर इंडियाला ४२ टक्के तर अन्य पक्षांच्या खात्यात १५ टक्के मते जातील असा अनुमान होता. आता ताज्या सर्वेक्षणात अन्य पक्षांची मते वाढत असल्याचे दिसत असून १८ टक्के मते त्यांच्याकडे जातील असे भाकित आहे.