पुणे- राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे. काही भागात उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आल्याचे चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहे, त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये
जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असले तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात. मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.