जळगाव :- सध्या केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या भावाने केळी खरेदी करत आहेत. त्यामुळे सरकारने केळीला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात केळीच्या दराने उच्चांक गाठत तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या महिनाभरात केळीचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलवर घसरले आहेत. जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशभरात केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे.
जळगावची अर्थव्यवसथा ही केळीवर अवलंबून आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळ तर कधी केळीच्या दरात घसरण होत आहे. अशा अनेक संकटांची मालिका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे सातत्याने येत आहे.
अनेक शेतकरी हे व्यापाऱ्यांना दोष देत असून, व्यापारी एकी करुन भाव पाडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या केळी पिकावर होणारा वाढता खर्च पाहता, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळीचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केळीला किमान दोन हजार रुपयांचा हमीभाव द्यावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
केळीपेक्षा आब्यांची मागणी वाढली…
सध्या संपूर्ण देशभर उष्णतेची लाट सुरु असल्याने केळीची मागणी कमी झाली आहे. शिवाय या वाढत्या तापमानात केळी झाडावर पिकण्याचे प्रमाण वाढल्याने अशी केळी बाजार पेठेत विक्रीसाठी आणने आणि देशभर पाठवणे शक्य होत नाही. त्यात भरीस भर म्हणून यंदा मोठ्या प्रमाणत आंब्याचे उत्पादन झाल्याने आंब्याचे दरही अतिशय निचांकी पातळीवर असल्याने केळीपेक्षा आंब्याला खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम हा केळीच्या मागणीवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.