मुंबई – राज्यात मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. परंतु आठवडाभरातच पावसाने उसंत घेतली. त्यानंतर मुंबईकरांना उकाड्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु मुंबईत पुढील चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
येत्या 23 जून आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील काही भागातून मान्सून परत येणार असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.
मुंबईतील कुलाबा येथे 33.7 अंश आणि सांताक्रूझ येथे 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 2.2 अंशांनी अधिक होते.
जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.