नवी दिल्ली – झारखंडमधील चंपाई सोरेन सरकारने आजपासून विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. केवळ झारखंडमधील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजने अंतर्गत विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी झारखंड सरकार दोन लाख रूपयांची मदत देणार आहे. या विवाहाची नोंदणी करणे मात्र अनिवार्य असणार आहे.
ज्यांचे आयुष्य कदाचित एका ठिकाणी थांबले होते त्यांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सरकारने पहिल्यांदाच अशा स्वरूपाची योजना आणली असल्याचे चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे.
आयुष्याचा नवा डाव सुरू करत असलेल्या आपल्या मुलींना प्रोत्साहन आणि आशीर्वाद द्या. विधवा अथवा परित्यक्त्या अथवा एकाकी जीवन कंठणाऱ्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पेन्शन देण्याची सुरूवातही देशात आमच्याच सरकारने सगळ्यांत प्रथम केली याचा आम्हाला अभिमान आहे.
आजच ५० पेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्या वर्गातील महिलांना पेन्शन देण्यास सुरूवात केली जाणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि या देवींच्या आशीर्वादाने महिला सबलीकरणाचे हे अभियान सुरूच राहील असेही चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे.