नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी अगदी लहान कार्यकर्त्यांचाही योग्य प्रकारे उपयोग करून घेते. यांनी १५- १८ वर्षे काम केले आहे. त्यामुळे भविष्यात योग्य ठिकाणी त्यांचा उपयोग केला जाईल आणि त्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाईल असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत सत्ता मिळाल्यानंतर भाजपने नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंह या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या भविष्याताबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आगामी काळात जनाधार असलेले हे नेते भाजपची डोकेदुखीही वाढवू शकतात अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे. त्या अनुशंगाने नड्डा यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
दरम्यान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे खूप अनुभवी आहेत. तसेच या राज्यात कोणा आदिवासी नेत्याला प्रोत्साहन देण्याची हिंमत आजपर्यंत कोणी दाखवली नव्हती. भाजपने ती दाखवली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव बोलताना ते म्हणाले की सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकास आणि सगळ्यांचे प्रयत्न हा आमचा सिध्दांत आहे आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करतो आहोत.
मोहन यादव हे एका मोठ्या समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे त्यांना संधी दिल्ली गेली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचा कार्यकर्ताही अशा प्रकारे राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे असेही नड्डांनी नमूद केले.