-प्रा. अविनाश कोल्हे
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ इतिहासात उत्तर प्रदेशात असलेल्या गोरखपूर जिल्ह्यातील “चौरी चौरा’ या छोट्या गावाचं आगळं महत्त्व आहे.
चौरी चौरा या गावी 4 फेब्रुवारी, 1922 रोजी घडलेल्या एका घटनेमुळे महात्मा गांधींनी 1920 मध्ये सुरू केलेले असहकाराचे देशव्यापी आंदोलन मागे घेतले होते. मागच्या आठवड्यातल्या गुरुवारी या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. या निमित्ताने देशांत अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हे कार्यक्रम उत्तर प्रदेशातील 72 जिल्ह्यांत संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमांची सांगता 4 फेब्रुवारी 2022 रोजी होईल. चौरी चौरा येथे 4 फेब्रुवारी, 1922 रोजी चिडलेल्या गावकऱ्यांनी एका पोलीस स्टेशनला आग लावली. यात 22 पोलीस आणि 3 लोकांना प्राण गमवावे लागले.
हे आंदोलन अहिंसक मार्गाने चालेल असा म. गांधींना विश्वास होता. चौरी चौराच्या घटनेने त्यांना कमालीचे दुःख झाले. ही घटना घडल्यानंतर त्यांनी एका आठवड्याच्या आत आंदोलन मागे घेतले. पहिल्या महायुद्धात (1914-1918) भारतीय जवानांनी अभूतपूर्व मर्दुमकी गाजवली होती. यामुळे आता इंग्रज सरकार भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करेल, अशी समस्त भारतीयांना आशा होती. इंग्रज सरकारने त्याऐवजी 1919 साली अतिशय धोकादायक तरतुदी असलेला रौलेट कायदा आणला. याच्या निषेधार्थ देशभर उग्र निदर्शनं सुरू झाली. यातीलच एक प्रसंग अमृतसर शहरातील जालियनवाला बागेत घडला. 13 एप्रिल, 1919 रोजी या बागेत गोळा झालेल्या
निःशस्त्र भारतीयांवर इंग्रज सरकारने बेछूट गोळाबार केला. यात चारशे लोक मारले गेले.
याच्या निषेधार्थ गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये असहकाराचे आंदोलन छेडले होते. पण गांधीजींच्या पद्धतीने त्यांनी मार्च 1920 मध्येच एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात असहकार आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट केले होते. यात स्वदेशी मालाचा वापर, सरकारी कामकाजावर बहिष्कार, सरकारी शाळा-कॉलेजांत न शिकणे, सरकारने दिलेल्या पदव्या आणि मानसन्मान परत करणे वगैरे कार्यक्रम अंतर्भूत होते. त्यानुसार आंदोलन सुरू झाले. देशभर अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलून टाकले. तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर मध्यमवर्गाचा वरचष्मा होता. गांधीजींनी याद्वारे सर्वसामान्यांना या लढ्यात सामावून घेतले. असहकार आंदोलनाच्या जाहीरनाम्यातील एक कलम “मी अस्पृश्यता पाळणार नाही’ असेही होते.
म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून जानेवारी 1915 मध्ये कायमचे भारतात परतले. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सुरुवातीची चार-पाच वर्षे भारताच्या विविध भागांचे दौरे केले आणि देशातील परिस्थिती समजून घेतली. या चार-पाच वर्षांच्या उमेदवारीच्या काळात त्यांनी 1917 सालचा चंपारण्याचा लढा, 1918 साली झालेला खेडा येथील लढा वगैरे लढे दिले आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. या दरम्यान त्यांनी केलेल्या दौऱ्यांत त्यांना जाणवले की भारताला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर हिंदू-मुस्लीम युती झाली पाहिजे. 1920 च्या असहकार आंदोलनादरम्यान त्यांना ही संधी मिळाली. तिकडे तुर्कस्तानात खलिफाचे उच्चाटन झाल्यामुळे भारतातील मुसलमान चिडले होते. याला इंग्रज सरकारने केलेली गद्दारी कारणीभूत आहे अशी जगभरच्या मुसलमानांत भावना होती. परिणामी भारतातील मुसलमानांनी “खिलाफत समिती’स्थापन करून इंग्रजांच्या विरोधात निदर्शनं करायला सुरुवात केली. गांधीजींना या परिस्थितीत दडलेली संधी दिसली आणि त्यांनी हिंदू-मुस्लीम एकी साधली.
फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा येथील घटना घडण्याच्या आधी काही दिवसांपासून गोरखपूर जिल्ह्यातले वातावरण तणावपूर्ण झाले होते. जानेवारी 1922 च्या मध्यावर कॉंग्रेस आणि खिलाफत समितीचे कार्यकर्ते लोकांना परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत होते. यामुळे चिडलेल्या स्थानिक पोलिसांनी एका प्रसंगी कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला. याचा निषेध म्हणून 4 फेब्रुवारी, 1922 रोजी लोकांनी मोर्चा काढला. यात सुमारे तीन हजार लोक सहभागी झाले होते. त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणा दिल्या. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. लोकांनी दगडफेक करून प्रत्त्युत्तर दिलं. पोलिसांनी मग लोकांवर थेट गोळीबार सुरू केला. यात तीन लोक मारले गेले तर अनेक जखमी झाले. यानंतर चिडलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक सुरू केली. पोलिसांनी माघार घेतली आणि पोलीस स्टेशन आतून बंद केले. राग अनावर झालेल्या लोकांनी मग पोलीस स्टेशनला आग लावली. तेव्हा भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड रिडींग होते.
या घटनेनंतर इंग्रज सरकारने मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केली अनेकांना अटक केली, खटले भरले. गोरखपूर सेक्शन कोर्टाने सुमारे 172 लोकांना फाशीची शिक्षा सुनावली. याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले. शेवटी 19 लोकांना फाशी देण्यात आली होती. गांधीजींच्या आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावर तेव्हाप्रमाणे आजही चर्चा सुरू असते. मात्र या निर्णयातून गांधीजींचा अहिंसेवर किती दृढ विश्वास होता, याची प्रचिती येते. गांधीजींच्या मते आंदोलनात अहिंसा शिरली की तुमच्या मागण्यांतील नेैतिक शक्ती लयाला जाते. नंतर मात्र चौरी चौरा येथे दोन स्मारकं उभी आहेत. एक स्मारक आहे ते कर्तव्य पार पाडताना जीव गेलेल्या पोलिसांचे तर दुसरे आहे आंदोलनकर्त्यांच्या स्मरणार्थ. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास किती गुंतागुंतीचा आहे, हेच यातून दिसून येते.
गांधीजींचे हे आंदोलन लौकिक अर्थाने अयशस्वी जरी ठरले तरी यातून त्यांनी इंग्रज सरकारला एक प्रकारे इशाराच दिला की साम्राज्यशाहीचे दिवस भरले आहेत. या लढ्याचा खरा फायदा म्हणजे भारतीयांच्या मनात खोलवर मूळं धरलेली इंग्रज सरकारची भीती कमी झाली. लोकांना लोकलढ्याचे महत्त्व कळले. सामान्य माणसं आनंदाने तुरुंगात जायला लागली. या लढ्याचा आणखी एक फायदा म्हणजे परदेशी मालावरील बहिष्कारामुळे स्वदेशी कंपन्या आणि भारतीय भांडवलदारांच्या मालाचा खप आकाशाला भिडला.
थोडक्यात म्हणजे 1920 च्या असहकाराच्या लढ्याने इंग्रज सरकारसमोर आणि इंग्रज भांडवलदारांसमोर जबरदस्त आव्हान उभे केले होते. या देशव्यापी लढ्यामुळे लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकीय जागृती निर्माण झाली. यातूनच पुढे 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.