– हेमंत देसाई
पश्चिम बंगालमध्ये एका अर्थाने ममतादीदींच्या नेतृत्वाखालील तृणमूलची “ए टीम’ आणि अमित शहांच्या नेतृत्वाखालील तृणमूलचीच “बी टीम’ असा संघर्ष होणार आहे.
माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार दिनेश त्रिवेदी यांनी गेल्या आठवड्यात अचानकपणे खासदारकीचा राजीनामा देत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना धक्का दिला. राज्यात विधानसभेच्या निवडणुका नजीक आल्या असून, त्यामुळे त्रिवेदी हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा, मतभेद व वाद होऊ शकतात, पण तृणमूलमध्ये मात्र हे शक्य नाही. नरेंद्रभाई आपले तीस वर्षांपासूनचे मित्र असून, त्यांचे दरवाजे माझ्यासाठी नेहमी खुले आहेत, असे स्पष्ट संकेतही त्रिवेदी यांनी दिले. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.
राज्यातील निवडणुका जवळ आल्यावरती त्यांना हा आवाज ऐकू येऊ लागला, हे विशेष. त्रिवेदी हे उत्तम इंग्रजी बोलणारे बुद्धिमान गृहस्थ आहेत. परंतु त्यांना कोणताही जनाधार नाही. मात्र तृणमूलचे एकापेक्षा एक बडे नेते आपल्याकडे येत आहेत, असे चित्र निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा राजीनाम्यांचे महत्त्व भाजपला आहे.
दीदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच पक्षातील आमदार यांना होलसेलमध्ये आयात करून भाजपने आपले विचारसरणीशी काहीएक देणेघेणे नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांना फक्त दीदींच्या घराला आग लावून, भाजपची सत्ता आल्यास त्याचे लाभ उठवायचे आहेत. परंतु त्यामुळे भाजपच्या प्रदेश शाखेचे अध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षातले अन्य मूळ नेते नाराज आहेत. तृणमूलचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मुकुल रॉय हे तीन वर्षांपूर्वी भाजपात आले आणि त्यानंतर सर्व निर्णय तेच घेऊ लागले. घोष हे शोभेपुरतेच अध्यक्ष राहिले आहेत. तृणमूलमध्ये फक्त दीदीच राहणार आहेत, असा पुकारा अमितभाईंनी यापूर्वीच केला आहे.
याचा अर्थ, यापुढे तृणमूलचे आणखी नेतेही भाजपमध्ये येणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तृणमूलच्या काही फुटीर नेत्यांना चार्टर प्लेनने दिल्लीला आणण्यात आले. तेथे अमितभाईंनी त्यांचे स्वागत केले.
2019ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून, तृणणूलचे 18 आमदार, एक मंत्री आणि एक खासदार भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. परंतु एवढी आवक होऊनही, अमितभाईंना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्यासारखा उमेदवार अद्याप मिळालेला नाही. क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष व प्रसिद्ध क्रिकेटपटू सौरभ गांगुली याला भाजपमध्ये आणून मुख्यमंत्री करावे, असे स्वप्न अमितभाई बघत होते. परंतु त्याला हृदयविकाराचा त्रास झाला आणि मग अँजिओप्लास्टीही करावी लागली. त्यामुळे सौरभ राजकारणात व भाजपमध्ये येईल, असे दिसत नाही. म्हणूनच मोदीच्या नावाने मते मागून विजय मिळवण्याचा फॉर्म्युला वापरला जाईल, अशी चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वी मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सव्वाशेव्या जन्मदिन सोहळ्यास कोलकाता येथे हजेरी लावली. त्यावेळी व्यासपीठावर ममतादीदीही हजर होत्या. मात्र काहीजणांनी त्यावेळी “जय श्रीराम’च्या घोषणा देऊन सरकारी समारंभास वेगळे स्वरूप दिले. तेव्हा उपस्थितांमधील दीदी रास्तपणे उखडल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला मोदींनी हल्दिया येथे गॅसची जोडणी करणाऱ्या चार प्रकल्पांचे लोकार्पण केले. हल्दिया हे यामुळे देशाचे आधुनिक व मोठे आयात-निर्यात केंद्र म्हणून विकसित होईल, असे सांगून मोदी यांनी आपण विकासपुरुष असल्याची प्रतिमा पुन्हा एकदा ठळक केली.
दुसरीकडे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यात रथयात्रा कार्यक्रमाचा शुभारंभ केला असून, प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे. या यात्रेस परवानगी देण्यावरूनही वाद झाला. परंतु अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करून, यशस्वीपणे वातावरणनिर्मिती करण्याचे तंत्र भाजपला चांगलेच अवगत आहे. एकीकडे मोदींचे वाढते दौरे आणि दुसरीकडे समाजमाध्यमांतून जोरदार प्रचार, ही भाजपची रणनीती आहे. तृणमूलपेक्षा भाजपचे निवडणुकीचे बजेट कैकपटींनी जास्त आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा पुरेपूर उपयोग प. बंगाल व आसामच्या निवडणुकांत केला जाणार आहे. प. बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा निर्धारच अमितभाईंनी केला आहे. सेक्युरॅलिझमचा आम्ही कसा पराजय केला, हे भाजपला दाखवून द्यायचे आहे.
ओवैसी यांनी राज्याचे दौरेही केले असून, राज्यातील प्रसिद्ध सुन्नी धर्मगुरू आणि नवनिर्मित इंडियन सेक्युलर फ्रंटचे नेते अब्बास सिद्दीकी यांच्याशी आघाडी करण्याचा ओवैसींचा विचार आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांचे हे प्रयत्न सफल ठरलेले नाहीत. सिद्दीकींना कॉंग्रेस व डाव्या आघाडीशी दोस्ती करायची आहे. पण तुम्ही आमच्याबरोबर आल्यास, ओवैसींशी कोणताही संबंध ठेवता येणार नाही, हे कॉंग्रेस व डाव्यांनी त्यांना स्पष्ट केले आहे. ओवैसी यांनी आम्हाला बिहारमध्ये मदत केली आणि ते बंगालमध्येही आमच्या मदतीस धावून येतील, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते साक्षीमहाराज यांनी केला आहे. प. बंगाल निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे नक्की.