पुणे – महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरू असून शुक्रवारी मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील काही भाग तो व्यापला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जोर वाढल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.
यंदा मान्सूनची वाटचाल रडतखडतच सुरू झाली आहे. महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी 20 जूनपर्यंत वाट पाहवी लागली. मान्सून दाखल झाला असला, तरी कोकण वगळता अन्य ठिकाणी अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाची गरज आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही हलक्या सरी होतील, असा अंदाज आहे. जैतापूर येथे गेल्या चोवीस तासांत 200 मिलिमीटर पाऊस झाला आहे.