मुंबई – करोना काळात दहावी बारावीच्या परिक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने सर्व देशभर एकसमान निर्णय घ्यावा अशी सुचना शिवसेनेने केंद्र सरकारला केली आहे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या संबंधात एखाद्या राज्याने स्वतंत्रपणे या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तर त्या राज्यातील विद्यार्थ्यांचे करिअरच्यादृष्टीने मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा एखाद्या राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याऐवजी सर्व देशभरच या विषयी एकसमान निर्णय घेतला जाणे महत्वाचे आहे.
10 आणि 12 च्या विद्यार्थ्यांच्या संबंधात भेदभाव होणे योग्य नाही ही बाब जाणून घेऊन केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्या संबंधात पुढाकार घेण्याची गरज आहे. देशात या परिक्षा घेणारे अनेक बोर्ड कार्यरत आहे. या सर्व बोर्डांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकसमान निर्णय तातडीने घेऊन तो त्यांना जारी केला पाहिजे असेही सावंत यांनी म्हटले आहे.
या परिक्षांसाठी ज्या वयोगटातील मुले सामोरी जाणार आहेत त्या वयोगटाचे देशात अजून लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. एकदा परिक्षा घोषित झाल्या की त्यात मायक्रो कंटेन्मेट भागातील विद्यार्थीही सहभागी होतील त्यामुळे एकूणच परिक्षा व्यवस्था धोक्यात येऊ शकते.