पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठात दाखल केलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र तो सामुहिक संसर्गातून झाला आहे की थेट संपर्कातून बाधा झाली आहे याबाबत तपासणी सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच्या पातळीवर घेण्यात येतो. केंद्राच्या पथकाने या महिलेची सर्व माहिती संकलीत केली आहे. त्यांनी काही पुरक माहिती मागवली होती, ती आम्ही दिली. त्या महिलेला मुंबईहून घेऊन येणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला ओळखले असून त्यांची नायडू रुग्णालयात तपासणी केली जात आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या 100 जणांवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी सकाळी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोलणे झाले आहे. त्यानुसार राज्य आणि केंद्र पातळीवरून असणाऱ्या अपेक्षा सांगण्यात आल्या आहेत. त्याची पुर्तता करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, असे म्हैसेकर म्हणाले.
ते म्हणाले, हा लढा विषाणू विरूध्द मानव असा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेचा बंद या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. जनतेने सहकार्य केल्यास आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असे ते म्हणाले. त्याचबरोबर होम क्वारंटाईन होण्यास ज्यांना सांगण्यात आले त्यांनी ते पाळले पाहिजे. ते तोडताना आढळल्यास आपण त्याचा व्हिडिओ पाठवावा, त्यांना जबरदस्तीने संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवण्यात येईल. मात्र त्यांना मारहाण करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. होम क्वारंटाईनचे आदेश उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एका व्यक्तीसाठी आम्ही जनतेला वेठीला धरू शकत नाही, असे ते म्हणाले.
रक्ताचा तुटवडा
ब्लड बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून शहरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे यावे. ब्लड बॅंकांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत मात्र एका वेळी 15पेक्षा जास्त जणांची गर्दी तेथे होणार नाही याची काळजी घ्या असे त्यांना सांगण्यात आले आहे.
आयटीला आदेश नाहीत
आयटी क्षेत्राशी बॅंक, इन्शुरन्स आणि अगदी आरोग्य क्षेत्रही संबंधित असते. त्यामुळे त्यांच्यावर बंधने आम्ही अद्याप लादली नाहीत. कोणत्या कामासाठी कोणते कर्मचारी कार्यालयात बोलवावेत, हे त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. कारण अत्यावश्यक सेवा या क्षेत्रावर अवलंबून आहेत असे ते म्हणाले.
अन्न धान्यासोबत त्यासंबंधातील अत्यावश्यक गरजा पुरवणारी क्लासिफिकेशन आम्ही तयार केली आहेत. त्या आधारे येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. आरटीओ आणि पोलिस अयुक्तांसोबत बैठक घेऊन वाहतुकी संदर्भात विचार सुरू आहे. त्याबाबत येत्या दोन दिवसांत स्पष्ट आदेश काढत आहोत. त्याची माहिती त्यानंतर देण्यात येईल, असे म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.