नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया पुढे आली आहे. केंद्र सरकारने कलम 370 आणि 35 अ हटवण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत धाडसी निर्णय असून त्याचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी दिली. कलम 370 आणि 35 अ हे यापूर्वीच रद्द झाले पाहिजे होते. परंतु आता उशीर झाला असला तरी हा निर्णय धाडसीच आहे, गुरूवारी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तान हा रा.स्व. संघाला लक्ष्य करत नसून पाकिस्तान भारताला लक्ष्य करत असल्याचे ते म्हणाले. इम्रान खान यांनी दिलेल्या कोणत्याही इशाऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या देशाची चिंता करावी, असे ते यावेळी म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवही आपली प्रतिक्रिया दिली.