कोल्हार, (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणूक गेल्या वर्षभरापूर्वी पार पडली. विखे विरुद्ध विखे अशा दोन गटांत अटीतटीची निवडणूक झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंचासह उपसरपंच पदाला गवसणी घालणाऱ्या गटात आता उपसरपंच पदाच्या वाटपावरून चांगलेच राजकारण तापले. विखे गटाचे विरोधक असणाऱ्या गटाला आता सत्तेत असलेले सदस्य अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असून विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा देऊन नवीन सदस्याना संधी द्यावी, अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हार खुर्दचे राजकारण हे विखे विरुद्ध तनपुरे असे सुरू होते, मात्र काही वर्षांपासून विखे गटात पडत असलेली फूट आणि स्थनिक पातळीवरील वातावरण यामुळे तनपुरे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेटला. त्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी विखे पाटलांच्या दोन गटांत सरपंच पदासाठी सरळ लढत होऊन सरपंच पदासह नऊ सदस्य निवडून आलेल्या गटाचा उपसरपंच निवडण्यात आला.
या प्रक्रियेला जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला असून आता अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. बहुमताने निवड झालेल्या उपसरपंच यांनी आता राजीनामा दयावा आणि नवीन सदस्याना या पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी द्यावी,असा पवित्रा सत्ताधारी गटातील सदस्यांनी घेतला. उपसरपंचांच्या राजीनाम्यासाठी आता सत्ताधारी गटातूनच दबाव वाढत असून गावातील राजकारण आता चांगलेच तापले आह.
विरोधक आणि सत्ताधारी एकच हे दोन्हीही गट विखेंचे समर्थक असल्यामुळे आता या पदाच्या राजीनाम्यासाठी कोण आग्रही आहे आणि कोण उत्सुक आहे, हे दिसणार आहे. महिलाराज असलेल्या या गावात महिला सदस्यांना घेऊन फिरताना घरातील पुरुषांची चांगलीच दमछाक झाली आहे. विद्यमान उपसरपंच मात्र राजीनामा देण्याच्या तयारीत दिसत नसल्याने यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतात का, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
आमचं कुणी ऐकत नाही
गेल्या काही वर्षापूर्वी बिनविरोधचा प्रयोग करून पद मिळण्याआधी राजीनामे देऊन देखील कुणी ऐकले नव्हते. आताही विद्यमान उपसरपंच आणि या पदासाठी उत्सुक असलेल्या सदस्यांना गावातील अनेक राजकारणी आणि अनुभवी मंडळींनी याबाबत समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यावेळी वापरलेले वाक्य आमचं कुणी ऐकत नाही, आता तंतोतंत लागू होत आहे.