– हेमंत देसाई
चंद्राबाबूंच्या अटकेमुळे जनतेमध्ये सहानुभूतीची लाट पसरत असल्यामुळे पुढील निवडणुकीत आंध्र प्रदेश राजकारणातील समीकरणे बदलू शकतात.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी गेल्या चार वर्षांत वाढतच गेल्या आहेत. सत्तेत असताना चंद्राबाबूंनी बनवलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुलडोझर फिरवला. ही इमारत नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आली होती, असा दावा सरकारने केला. यापलिकडे जाऊन, चंद्राबाबूंच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरूनही वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून तो बनवण्यात आला असल्यामुळे, तो रस्ता शेतकऱ्यांना परत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. चंद्राबाबू ज्या इमारतीत अधिकाऱ्यांच्या व पक्षाच्या नेत्यांच्या बैठकांसह जनता दरबार भरवायचे, ती इमारत जमीनदोस्त करण्यात आली. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेनेच्या दोन गटांत किंवा भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यात संघर्ष सुरू आहे, तसेच आंध्र प्रदेशमध्ये घडत आहे.
आता तर आंध्र प्रदेश सरकारच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चंद्राबाबूंना अटकच केली असून, त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. ही अटक म्हणजे या प्रकरणात भाजपला गोवण्याचा प्रयत्न आहे, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मत असल्याची माहिती तेलुगू देसमचे नेते व चंद्राबाबूंचे चिरंजीव नारा लोकेश यांनी दिली आहे. अमितभाईंनी चंद्राबाबूंना ज्या तुरुंगात ठेवले आहे, तेथील परिस्थिती कशी आहे, तसेच कोणत्या प्रकरणात ही अटक झाली आहे, याची व न्यायालयातील सुनावणीची माहिती घेतली. लोकेश यांनी नवी दिल्लीत जाऊन शहा यांची भेट घेतली, तेव्हा भाजपचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष दग्गुबती पुरंदेश्वरी आणि तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी हे उपस्थित होते. पुरंदेश्वरी या लोकेशच्या मावशी आहेत. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसमशी भाजप पुन्हा दोस्ती करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
2014 साली आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी आंध्र प्रदेशला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत असा आरोप करून, चंद्राबाबूंनी 2018 साली भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. दुसरीकडे, जगनमोहन रेड्डी हे चंद्राबाबूंचे प्रतिस्पर्धी वेळोवेळी मोदी सरकारची भलावण करत होते वा महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी त्यास पाठिंबाही देत होते. आंध्र प्रदेश कौशल्यविकास महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गेल्या महिन्यात चंद्राबाबूंना अटक करण्यात आली. त्यावेळी भाजपचे केंद्रीय नेते मौन बाळगून होते. परंतु आता लोकेशने भेट मागितल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना वेळही दिला. केवळ राजकीय सूडबुद्धीतून माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
हे सर्व कारस्थान भाजपने रचले आहे, असे वायएसआर कॉंग्रेसचे आमदार-खासदार सांगत फिरत आहेत. गेल्या महिनाभर भाजपने मौन बाळगल्यामुळे असे आरोप होऊ लागल्याचे आपण शहा यांना सांगितले, अशी माहिती लोकेश यांनी दिली. त्यावर भाजपला यात गुंतवले जात असल्याबद्दल शहा यांनी नापसंती व्यक्त केली. वास्तविक देशभरातील विरोध पक्षांच्या नेत्यांना विविध तपास यंत्रणांमार्फत सतावण्याचे काम मुख्यतः भाजपच करत आहे. अशा वेळी लोकेश यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणे, हाच मोठा विनोद असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राज्यात अडचणीत आल्यावर, केंद्राचे तरी छत्र आपल्या डोक्यावर असावे, असे तेलुगू देसमला वाटतच असणार. देसम पुन्हा एकदा रालोआत जाण्याच्या प्रयत्नात असावा असे दिसते. आमची याबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे लोकेश यांनी म्हटले असले, तरी त्या दिशेनेच पावले पडत आहेत, हे स्पष्ट दिसते.
चंद्राबाबूंना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे, तेथे कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, भयानक स्थितीत ते राहत आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, असे लोकेश यांनी समाजमाध्यमातून म्हटले आहे. चंद्राबाबूंच्या अटकेमागे भाजपच असल्याचा आरोप तेलंगण कॉंग्रेसचे नेते मधू याशकी यांनी केला आहे. तर भाजप व वायएसआर कॉंग्रेसचे सख्य असल्यामुळेच चंद्राबाबूंना अटक होऊ शकली, असे तेलुगू देसमच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. चंद्राबाबूंच्या अटकेमागे केंद्र सरकारचा हात नाही वा त्याचे यास समर्थनही नाही, हे स्पष्ट करण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकेश यांना भेटीची वेळ दिली, असा खुलासा पुरंदेश्वरी यांनी केला आहे. जर भाजपच या अटकेस जबाबदार असता, तर शहा यांनी लोकेश यांना भेट नाकारलीच असती, असे पुरंदेश्वरी सुचवू पाहत आहेत. पुरंदेश्वरी या चंद्राबाबूंच्या मेहुणी असून, कोणतीही नोटीस न देता, एफआयआरमध्ये नावाचा उल्लेखही न करता, कोणतेही स्पष्टीकरण न मागवता, चंद्राबाबूंना झालेल्या अटकेचा पुरंदेश्वरींनी निषेध केला आहे.
मात्र लोकेश-शहा यांच्या भेटीनंतर, चंद्राबाबूंना बाहेर काडण्यासाठी तेलुगू देसम हा पक्षच भाजपात विलीन करण्यात येणार आहे, असा दावा आंध्र प्रदेशचे एक मंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे नेते अंबती रामबाबू यांनी केला आहे. तेलुगू देसम हा पक्षच नष्ट व्हावा, ही वायएसआर कॉंग्रेसची इच्छा असली, तरी अशा गोष्टी काही वास्तवात येत नसतात. उलट चंद्राबाबूंचे घोटाळे केंद्रीय तपास यंत्रणांनीच बाहेर काढले आहेत, असे जगनमोहन रेट्टी म्हणत आहेत. चंद्राबाबू यांचा मानसपुत्र पवन कल्याण हा रालोआ आघाडीत आहे, तर त्यांची मेहुणी पुरंदेश्वरी ही भाजपमध्ये आहे. त्यामुळे तेलुगू देसम आणि भाजप यांचे नाते जवळचे आहे, असे जगनमोहन सुचवू पाहत आहेत.
चंद्राबाबूंच्या अटकेमुळे त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लवकरच आंध्र प्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलण्याचीच ही नांदी आहे.