कऱ्हेच्या पुराचा फटका; खळद ते वाळुंजपर्यंत सहा महिन्यापूर्वीच केले होते काम
खळद- खळद-वाळुंज रस्त्याच्या कामावर सहा महिन्यांपूर्वीच एक कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. हा रस्ता दि. 25 सप्टेंबरला कऱ्हा नदीला आलेल्या पुरात पूर्णत: वाहून गेला असल्याने या रस्त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली जावू लागली असून बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष असल्याने नारिकांना धोकादायकरित्या येथून प्रवास करावा लागत आहे.
कऱ्हा नदीला महापूर आला होता. यावेळी नदीकडेने असणारा वाळुंज रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला होता. परंतु, पुरात हाच रस्ता वाहून गेला आहे. नव्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
या मार्गावरून खळद गावच्या खंडोबाचीवाडी, वाळुंज येथील नागरीकांना प्रवास करावा लागतो. कऱ्हा नदीला सध्या पाणी असल्याने हा रस्ता बहुतांशी पाण्याखाली जात आहे तर पाणी कमी झाल्यावर नागरिककडेच्या पाण्यातून मार्ग काढून जात आहेत. रस्ता पाणीखाली गेला की, हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठीही नारिकांना वाळूंज, शिवरी मार्गे जवळपास दहा किलोमीटरचा वळसा घालून खळद येथे यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले असून हा रस्ता होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित करीत आहेत.
- पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता यांनी या रस्त्याच्या कामाबाबचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून वरीष्ठ विभागाला सादर केले आहे. त्यानुसार त्यावर निर्णय झाल्यानंतर सदर रस्त्याचे काम केले जाणार आहे.
– सुरेश जगताप, ग्रामसेवक