नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेवरून भाजप शिवसेनेत काडीमोड झाला आहे. त्यामुळे शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. अद्याप भाजप सोबतची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आता फक्त बाहेर पडण्याची औपचारिकताच बाकी राहिली असल्याचं बोललं जात आहे. तर राज्यसभेत भाजपासोबत बसणारे शिवसेनेचे खासदार आता विरोधकांच्या बाकांवर बसणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेला एनडीएच्या बैठकीला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला जाणार आहोत, आम्ही बाहेर पडण्याबाबत अजून कुठेही जाहीर केलेलं नाही. राज्यसभेतील आमच्या खासदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केल्याचंही कानावर आलं आहे. भाजपला ही दुर्बुद्धी सुचली असेल तरीही आम्हाला त्याचा फरक पडणार नाही’.
Sanjay Raut, Shiv Sena: We have got to know that the seating arrangement of two Shiv Sena MPs has been changed in the Parliament. https://t.co/vOKQ8p1pT9 pic.twitter.com/KGPGS60y4R
— ANI (@ANI) November 16, 2019
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. त्यापूर्वी एनडीएतील घटकपक्षांची बैठक होते. त्यासाठी भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती या मित्र पक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते.