पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती मतदारसंघातील अर्ज भरण्याची सुरवात आठवड्याभरात सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू असून प्रत्येक मतदारसंघात मतपेट्या वाहून नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) ९३१ बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ‘पीएमपी’ने या बस पुरविण्याचे नियोजन केले आहे. याबाबतचा आढवा घेण्यासाठी डेपो व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणुकांमध्ये मतपेट्या वाहून नेण्यासाठी पीएमपीकडून बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदान केंद्रानुसार किती बस लागतील. याबाबत ‘पीएमपी’ला सांगितले जाते, त्यानुसार पीएमपीकडून बस पुरविल्या जातात. यावेळी लोकसभेचे मतदान पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत होणार आहे.
बारामती मतदारसंघासाठी दि. ७ मे तर पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. यामध्ये खडकवासला, पुरंदर, सासवड, जेजुरी, हडपसर यासह शिरूर आणि मावळ मतदारसंघातील भागात पीएमपी सेवा दिली जाते.
या ठिकाणी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी बस पुरविल्या जातात. यावेळी ९३१ बस पुरविण्यात येणार आहेत. पुणे मतदारसंघासाठी एकूण २०३ बसचे नियोजन असून, मावळ मतदारसंघासाठी १७५, शिरूरसाठी १४० तर बारामती मतदारसंघासाठी ११३ बसचे नियोजन करण्यात आले आहे.
मतपेट्यांसाठी दोन दिवस बस धावणार…
मतदानाच्या आदल्या दिवशीच सकाळी मतपेट्या वाहून नेण्यासाठी बस संबंधित मुख्य केंद्रावर जातील. मुख्य केंद्रावरून मतपेट्या घेऊन बसला दिलेल्या केंद्रावर मतपेट्या पोहोचवल्या जातील.
एका बसमध्ये चार ते पाच मतदान केंद्रांच्या पेट्या असतील. त्या पेट्या पोहचून आल्यानंतर बस पुन्हा मार्गावर जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान संपायच्या अधी एक तास पुन्हा या बस मतपेट्या गोळा करण्यासाठी त्यांना दिलेल्या केंद्रांवर जातील. एखादी बस बंद पडली तर त्यासाठी राखीव बसही ठेवण्यात येणार आहेत.