नवी दिल्ली : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी वळणाच्या रस्त्यामुळे चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. अपघातातील मृत भाविक हे रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा , दीपा, सविता, सुप्रीता, मारुती, इंदिरव्वा अशी मृतांची नावे आहेत.
सौंदत्ती हुल कुंद गावातून दर्शनासाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे जात असताना ही घटना घडली. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिलं. त्याने गाडी थांबवले आणि भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असे सांगितले. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि त्यात सहा जणांनी आपले प्राण गमावले.
बेळगावातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी ही कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला यल्लामा देवीची यात्रा भरते. यल्लमा देवीच्या यात्रेला पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि अन्य ठिकाणाहून लाखो भाविक सौंदत्ती डोंगरावर येत असतात. करोनाच्या काळात यल्लमा देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद होते. परंतु 2022 मध्ये यल्लमा देवीची यात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यात आली होती.