प्रवाशांसह स्थानिकांचा सवाल : महाळुंगे इंगळेतील जुन्या दगडी पुलाची स्थिती
महाळुंगे इंगळे – चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे येथील खचलेला जुना दगडी पूल अत्यंत धोकादायक बनला असून, या ठिकाणी अनेकदा मोठ-मोठे अपघात होवून अनेकांचे नाहक बळी गेले आहेत, त्यामुळे कमानीचे दगडी बांधकाम असलेला हा पूल दुरुस्त होणार तरी कधी, असा सवाल प्रवाशांसह स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
चाकणला मोठी औद्योगिक वसाहत असल्याने आणि अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्यावर महाळुंगे इंगळे येथील हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या पुलालगत झाडाझुडपांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे. पूल धोकादायक बनत चालला असून, मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. येथील पुलाची त्वरित दुरूस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा पूल अरुंद असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या दुरूस्ती पेक्षा नव्याने पुल बांधणे अपेक्षित आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीचा ब्रिटिशकालिन पूल वाहून गेल्याने राज्यातील ब्रिटिशकालीन फुलांच्या संरक्षणाचा व सुरक्षेचा प्रश्न बहुचर्चित आहे. चाकण-तळेगाव दाभाडे या महामार्गावरिल महाळुंगे येथील या दगडी पुलावरून खूप मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वाहतूक होते. याठिकाणी कोणाताही उपमार्ग नाही. काही वर्षांपूर्वी या पुलाची नावाला मलमपट्टी करून दुरस्ती करण्यात आली होती; परंतु पुलाला जो आधार देण्यात आला होता, त्यामध्ये व पुलामध्ये खूप मोठी फट पडली आहे.
त्यामधील भाग भुसभुशीत होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलालगत मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जातो. त्यामुळे पुलाला घुशीने मोठ्या प्रमाणात उकरले आहे. पुलालगत झाडांनी पांघरूण घातले आहे. दगडी पुलाचे अनेक दगड खचले असून धोकादायक झाले आहे. पुलाच्या बाजूने पावसाचे पाणी वाहत असल्याने पुलाचा बरासचा भाग खचला आहे.