तळेगाव दाभाडे (मनोहर दाभाडे) – ’पोरगी तिशीची झाली, पण लग्नाच काही जमेना. पोरग्याचेही कुठे काही जुळेना. काय पण करा, पण एवढं कार्य उरका’, असे अगतिक झालेले हजारो पालक लग्न जमविणाऱ्यांच्या मागे लागली आहेत.
काहीही करून पोरा-पोरीचे आयुष्य एकदाच सुरळीला लावण्यासाठी जीवाचा आटापीटा करत आहेत. वय उलटून गेले तरी मुला-मुलींची लग्ने होईनात. त्यामुळे मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
घर बघाव बांधून आणि लग्न बघाव करून अशी म्हण आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. घर आणि लग्न या दोन गोष्टीच माणसाचं आयुष्य स्थिरस्थावर करत असतात. यातलं घर बांधणं एकवेळ लांबलं तरी चालतं पण लग्न? ते तर योग्य वयातच होणे आवश्यक आहे. शिक्षण झाले की बावीसव्या वर्षी ते नोकरी, व्यवसायात अडकतात आणि मग लग्न. पण, समाजात अशी परिस्थिती आहे की, मुलांमुलींची वयाची पस्तीशी आली तरी लग्नच होत नाही.
निराशेच्या गर्तेत अडकलेली अशी कित्येक मुले-मुली भयंकर मनस्थितीत जगत आहेत. शिक्षण-करिअर-जॉब शिकल्याशिवाय तरणोपाय नाहीच. आपलीच मक्तेदारी समजणाऱ्या पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. शिक्षणात नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर लाखोचे पॅकेज घेत मुली विविध क्षेत्रात स्थिरावल्या आहेत. प्रशासकीय सेवा, वैद्यकीय अभियांत्रिक क्षेत्र पोलीस आणि सैन्य दल, आयटी, रिसर्च, मीडियापासून ते राजकारणापर्यंत मुलींनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. पण, यानंतर जेव्हा उच्च करिअर केलेल्या मुलीच्या जोडीदाराचा सवाल येतो तेव्हा मात्र अनेक सवाल उभे राहतात.
जात-धर्म-भावकी काही सुटत नाही आणि या साऱ्या चक्रातून आपणाला, आपल्या स्टेटसला शोभेल असा जोडीदार मिळणे महाकठीण होऊन बसले आहे. मुलीला शिकविणे सोपे पण शिकलेल्या मुलीला स्थळ बघणे जिकीरीचे झाल्यासारखी परिस्थिती आहे. एका बाजूला शिक्षण आणि करिअरनंतर नोकरीपर्यंत वाढत गेलेले वय, बदललेली आर्थिक परिस्थिती, त्यामुळे बदललेले समाजातील स्थान, त्यानुसार बदलत गेलेल्या स्थळ आणि जोडीदाराबाबतच्या अपेक्षा एकीकडे आणि अपेक्षापूर्तीची वाट बघत बघत निसटून चाललेला काळ. यामुळं साऱ्याच जाती धर्मातील मुलींचे पालक काळजीत आहेत.
सामाजिक प्रश्न
मुला-मुलींचे वाढत चाललेले वय आणि लांबत चाललेले लग्न हा विषय फक्त एकाद्या जातीपुरता, धर्मापुरता, समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सामाजिक प्रश्न झाला आहे. कुटुंब आणि समाज व्यवस्थेसमोरच्या या प्रश्नातून अनेक गंभीर प्रश्न उभे रहात आहेत. लग्राच्या नावाखाली एजंटगिरी फोफावली आहे. पैसा घेऊन खोटी लग्ने करण्याचे आणि गंडा घालण्याचं प्रमाण वाढलं आहे. वाढत्या वयात लग्न झालच तर वंध्यत्वाचे प्रश्न गंभीर होत आहेत. नव्या पिढीत शारीरिक, भावनिक, मानसिक प्रश्न वाढत आहेत. यासोबत परिस्थिती आणि आर्थिक तडजोडींमुळे आंतरजातीय, आंतरधर्मिय लग्नांकडे कल वाढला आहे.