अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – राष्ट्रीय पक्षांनी विधानसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करताना शेवटपर्यंत संभ्रम व रस्सीखेच कायम ठेवण्याची श्रीगोंदा तालुक्याला प्रदीर्घ परंपरा आहे. यंदा देखील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी ही प्रथा (की खोड ?) जिवंत ठेवली आहे.
श्रीगोंदा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास कमी-अधिक प्रमाणात हे चित्र दर निवडणुकीत पाहायला मिळते. 1962 ला बाबूराव भारस्कर मूळ राहणार शेवगाव यांना कॉंग्रेसची अनपेक्षित उमेदवारी मिळाली. 1967 ला तेच उमेदवार राहिले. 1972 ला मात्र भारस्कर यांची कोंडी त्यांच्याच पक्षाने केली. प्रभाकर शिंदे (श्रीरामपूर) यांना कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी देऊन भारस्कर यांना खिंडीत गाठले. 1978 ला हा मतदारसंघ खुला झाला.
शिवाजीराव नागवडे की कुंडलिकराव जगताप, हा घोळ कायम होता. 1980 ला जगताप यांना जाहीर झालेले तिकीट व एबी फॉर्म माघारी घेण्यात आला व नागवडे यांना तो दिला. त्याच वेळी जनता पक्षाने देखील बबनराव पाचपुते की भानुदास सावंत, असा संभ्रम केला. परिणामी पाचपुते जनता पक्षाचे उमेदवार असताना पक्षाचे चिन्ह (नांगरधारी) त्यांना मिळाले नाही. त्यांना छत्री चिन्ह घ्यावे लागले. 1985 ला पाचपुतेंऐवजी पर्यायी उमेदवार शोधण्याचा प्रयत्न जनता पक्षाकडून झाला.
मात्र पाचपुतेंनी डॉ. कुमार सप्तर्षी यांचा हा डाव उधळून लावला. त्याच वेळी कॉंग्रेस पक्षाने ऍड. सुभाष डांगे यांना उमेदवारी जाहीर केली होती. शेवटच्या क्षणी वसंत दादा पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे शिवाजीराव नागवडे यांना तिकीट मिळाले. कुंडलिकराव जगताप यांना यावेळी कॉंग्रेसने पुन्हा दगा दिला.
1990 ला बबनराव पाचपुते यांच्या उमेदवारीची घोषणा जनता दलाने आधीच केली होती. कॉंग्रेसने मात्र बाबासाहेब भोस की शिवाजीराव नागवडे हा संभ्रम शेवटच्या क्षणापर्यंत टिकविला. नागवडे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. 1995 च्या निवडणुकीत पाचपुते कॉंग्रेसवासी झाले होते. नागवडे उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हते. मात्र बाबासाहेब भोस यांच्यासाठी नागवडे यांनी जोरदार प्रयत्न केले. भोस यांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करायला लावली. उमेदवारी मात्र पाचपुतेंना दिली. यामुळे भोस यांनी बंड पुकारले.
1999 च्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात घनश्याम शेलार यांचा उदय झाला. त्यांना भाजपची विधानसभेची उमेदवारी अपेक्षित असताना पक्षाने खासदारकीचे आमिष दाखविले व तेही ऐनवेळी डावलले. शेलारांनी बंड केले म्हणून भाजपची विधानसभेची उमेदवारी ऐनवेळी ऍड. कैलास शेवाळे यांच्या गळ्यात पडली. पाचपुते व नागवडे अनुक्रमे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले.
2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाचपुतेंना उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत तिष्ठत ठेवले. श्रीगोंद्यात नागवडे विद्यमान आमदार असल्याने जागावाटपात कॉंग्रेसकडे हा मतदारसंघ होता. पाचपुते यांच्यासाठी शरद पवार यांनी सोनिया गांधींपर्यंत रदबदली केली. मात्र त्यात यश लाभले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून पाचपुतेंनी बंडखोरी केली.
2009 मध्ये राष्ट्रवादीने पाचपुते यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर केली. भाजपने मात्र तळ्यात-मळ्यात करीत राजेंद्र नागवडे की कुंडीलकराव जगताप हा घोळ शेवट पर्यंत कायम ठेवला. तेव्हाच्या भाजप खासदार रूपाताई निलंगेकर यांच्या मार्फत भाजपची उमेदवारी मिळवण्यात नागवडे यशस्वी झाले. ते सुद्धा शेवटच्या क्षणी. 2014 च्या निवडणुकीत पाचपुते यांनी भाजपची वाट धरल्याने अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी मिळाली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत उमेदवारीसाठी अर्धा डझन इच्छुक होते.
घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, कुंडलीकराव जगताप, राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा यापैकी राहुल जगताप यांनी उमेदवारी मिळवली. तो पर्यंत पाचपुते विरोधात कोण? याची संभ्रमावस्था शेवटपर्यंत टिकून होती. यंदा पाचपुते यांचे तिकीट जाहीर झाले. आता राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार जगताप की घनश्याम शेलार, याची उत्सुकता ताणली जात आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.
घनवट यांना उमेदवारीची लॉटरी
2004 च्या निवडणुकीसाठी कुंडलीकराव जगताप यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. परंतु जागावाटपात हा मतदार संघ भाजपचा मित्रपक्ष शेतकरी संघटनेकडे गेला. त्यासाठी शरद जोशी यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी डावलली जाण्याची कुंडलीकराव जगताप यांची परंपरा 2004 ला घनवट यांनी पुढे नेली. दैवाने दिले पण कर्माने नेले, असा घनवट यांचा निवडणूक निकाल ठरला.