मंचर- कर्करोगाचे निदान वेळेतच झाले तर निश्चितच या रोगावर मात करणे शक्य होते. त्यामुळे या आजाराची वेळेतच तपासणी करणे गरजेचे आहे. कर्करोग आजाराला रुग्णांनी घाबरुन न जाता वेळेत उपचार करणे गरजेचे आहे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत कॅन्सर निदान शिबिर आळंदी देवाची येथील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाऊंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युट, डी. जी. फाउंडेशन, शरद सहकारी बॅंक मंचर, भीमाशंकर साखर कारखाना पारगाव, मोरडे फुड्स मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा होते. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, शिरुरचे सभापती विश्वास कोहकडे, अजय घुले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, उत्तम थोरात, पूर्वा वळसे पाटील, सुषमा शिंदे, अरुणा थोरात, संतोष भोर, संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. नितिन गोसावी, डॉ. गणेश पवार, रुग्णकल्याण विकास समितीचे सल्लागार डी. के. वळसे पाटील, जगदीश घिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, व्यसनामुळे आजार वाढीस लागले जातात. तरीही व्यसन सोडायला कोणी तयार होत नाही. जीवन जगताना व्यसनाचा तिरस्कार करावा. शिबिरात तपासणी करताना आजार आढळला तर या आजारावर मोफत उपचार इंद्रायणी हॉस्पिटल आळंदी येथे मोफत उपचार केले जाणार आहेत. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आभार मानले.