राजगुरूनगर -खेड तालुक्यातील दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करणे, त्याही नोंद न ठेवणे, कार्ड धारकांशी उद्धट वागणे आदी कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून ही कारवाई करण्यात आली आहे.
पांगरी येथील संभाजी बाजीराव तळेकर, वडगाव घेनंद येथील संपत बाबुराव बवले यांच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशनधारकांना शासनाने दिलेल्या साठ्यापेक्षा कमी धान्य देण्यात येत होते. आलेल्या धान्याची व वाटप धान्याची नोंद ठेवली जात नव्हती. भाव फलकावर भाव लिहिले जात नव्हते, स्टॉक पत्रक भरले जात नव्हते आणि आलेल्या रेशनकार्ड धारकांशी उद्धट बोलले जात असल्याच्या अनेक तक्रारी तालुका पुरवठा विभाग व तहसीलदार यांच्याकडे आल्या होत्या.
त्यानुसार मंडलाधिकारी, पुरवठा अधिकारी तलाठी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी भेटी देऊन संबंधित दुकानदारांची कानउघाडणी केली होती; मात्र त्यात बदल होत नसल्याने या दोन दुकानदारांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यानंतर या दुकानावर मोठी कारवाई केली जाणार आहे.
पांगरी येथील संभाजी बाजीराव तळेकर यांचा परवाना तात्पुरता रद्द करून बुट्टेवाडी येथील आशा प्रभाकर पोळ यांच्या स्वस्त धान्य दुकानात पुढील आदेश येईपर्यंत धान्य वाटप होणार आहे. वडगाव घेनंद येथील संपत बाबुराव बवले यांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असून पुढील आदेश होईपर्यंत भोसे येथील अरुण हलगे यांच्या दुकानातून धान्य वाटप केले जाणार आहे.
दुकानदारांनी केलेली पापे धुण्याची वेळ देशात आणीबाणी आहे. देशात लॉकडाऊन झाल्याने गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे अशा काळात त्यांना रेशन धान्य वेळेत व सरकारने दिलेल्या वजनात ते मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून रेशन धान्य वेळेत वाटप केले गेले आहे. खेड तालुक्यात अनेक रेशन दुकानात कार्डधारकांना राशन पूर्ण क्षमतेने मिळत नाही. अनेक गावातील रेशन दुकानाच्या बाबत तक्रारी आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाईसाठी ही वेळ नाही. त्यामुळे यापूर्वी धान्य दुकानदारांनी केलेली पापे धुवून टाकण्याची वेळ आली आहे.
पाच किलो मोफत तांदूळ वाटप सुरू
खेड तालुक्यात गरीब गरजू नागरिकांसाठी शासनाकडून 5 किलो तांदूळ उपलब्ध झाला असून 188 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांपैकी 39 दुकानात वाटप सुरु झाले आहे. उर्वरित दुकानातून ते लवकरच सुरू होणार आहे.
धान्य बॅंक सुरू करण्याचा प्रयत्न
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना गावागावातील सीमा बंद केल्या आहेत त्यामुळे अनेक गरजू व गरिबांना धान्य मिळत नाही शिवाय त्यांचा रोजगार बंद आहे अशा नागरिकांना काही दानशूर व्यक्ती संस्था आणि संघटनांकडून धान्य उपलब्ध करून देण्यासाठी धान्यबॅंक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. चाकण एमआयडीसी मधील काही कंपन्यांकडे तसा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
याबरोरबच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावपातळीवर धान्य बॅंक सुरू करून दानशूर व संस्थांकडून मिळालेली धान्य व मदत गावातील गरजू, गरीब नागरिकांना देण्यात यावी. प्रत्येकाने आपल्यातील सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मदत करावी, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.