पुणे – आंबील ओढ्याला आलेल्या पूरस्थितीनंतर नागरिकांना मदत करणे तसेच स्वच्छतेसह इतर तातडीच्या कामासाठी महापालिकेच्या सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांसह, क्षेत्रीय अधिकारी, तसेच वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या सुमारे 100 हून अधिक अभियंत्याचा समावेश आहे.
मुसळधार पावसाने कात्रज, अरण्येवर, पद्मावती, आंबील ओढा, धनकवडी, सिंहगड रस्ता, बालाजीनगर परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे या घरांमध्ये गाळ आणि कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. ज्या भागात ही पूरस्थिती उद्भवली आहे, तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह, परिमंडळ प्रमुख, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, पथ, वाहन, अतिक्रमण निर्मूलन, ड्रेनेज स्वच्छता विभागासह, समाज विकास विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांच्या 28 आणि 29 सप्टेंबरच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आयुक्तांच्या आदेशाशिवाय शहर न सोडण्याच्या सूचनाही या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.