टोरांटो – भारतातून थेट विमाने येण्यावर घातलेली बंदी कॅनडाने सोमवारपासून उठवली आहे. ट्रान्सपोर्ट कॅनडाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पाच महिन्यांनतर कॅनडात भारतीय विमनांना उतरू देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अतिरिक्त आरोग्य सुविधांची सोय करून भारतातून येणाऱ्या थेट विमनांना कॅनडात उतरता येईल, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. अधिकृत लॅबोरेटरीमधील करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा 18 तास आधी घेतलेल्या चाचणीच्या अहवालाचा पुरावा प्रवाशांजवळ आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात करोनाची दुसरी लाट येताच भारताकडे जाणाऱ्या अणि भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर एप्रिल महिन्यात बंदी घालण्यात आली होती. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन्ही देशातील हवाई वाहतूक सुरळीत होण्यासाठी आश्वासक पाऊल असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
थांबा घेऊन प्रवास करणाऱ्यांना मात्र कॅनडात प्रवेश करण्यापुर्वी ते थांबा घेत असलेल्या तिसऱ्या देशात घेतलेले करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे, असेही या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.