मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध देश, संस्था आणि व्यक्ती संशोधन करत आहेत. वेगवेगळे अभ्यास केले जात आहेत अन् निष्कर्षही मांडले जात आहेत. त्यातील काही निष्कर्ष चकित करणारेही आहेत. असाच एक निष्कर्ष एका जॉर्जिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने काढल्याचे वृत्त एका वेबसाइटवर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या देशांत अर्थात जगाला जर लॉकडाऊनमधून सुरक्षित बाहेर पडायचे असेल तर करोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा ढालीसारखा वापर करून घ्यावा लागेल.
हा निष्कर्ष नक्की काय आहे, ते पाहू या…
संबंधित अभ्यासकांच्या मते करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या असतात. तर आपले आर्थिक गाडे रूळावर आणण्यासाठी या अशा करोनामुक्त लोकांना जास्तीत जास्त पुढे करायचे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपस्थिती जास्तीत जात असली पाहिजे, अशी खबरदारी घ्यायची. इतर लोक असतातच. त्यांनी सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे पालन करायचे. कारण त्यांना लागण होण्याचा धोका असतो. मात्र करोनामुक्त व्यक्तीला तो धोका नसतो व सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडून अन्य व्यक्तीला धोका नसतो. अशा नागरिकांचा सहभाग वाढवून जे काही उद्योग, व्यापार, व्यवसाय थंडावले आहेत ते पुन्हा सुरू करता येऊ शकतात.
संबंधित अभ्यासकांनी यासंबंधिची आकडेवारीही दिली आहे. त्यांच्या मते समूह संसर्गाचा उच्च धोका असलेल्या 1 कोटी लोकांमध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे किमान 71 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मात्र करोनामुक्त लोकांचा वावर जास्त ठेवला तर हाच मृत्यूचा आकडा 20 हजारांपर्यंत खाली येऊ शकतो. याला त्यांनी मानवी ढालीची उपमा दिली आहे.
अभ्यासकांच्या मते जरी करोनामुक्त सर्वकाळ सगळीकडे उपस्थित करता येऊ शकले नाहीत आणि मोजक्याच वेळी व मोजक्याच ठिकाणी त्यांनी व्यवहार हाताळले तर मृत्यूंची संख्या 71 हजारांऐवजी 58 हजारांपर्यंत रोखता येऊ शकते. सूमह संसर्गाचा धोका ज्या भागात तुलनेत कमी आहे, तेथे तर हे प्रमाण 34 हजारांपर्यंत आणता येऊ शकतो. त्यामुळे करोनामुक्त व्यक्तींवर समाजाला करोनापासून वाचविण्याची जबाबदारी येणार आहे.