नगर – जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या दोन आणि पुण्याहून आलेल्या एक, अशा तीन व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या 16 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 75 इतकी असून, जिल्ह्यात 91 रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची वाटचाल शंभरीकडे सुरु आहे.
जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधित आढळून आल्या असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
मुंबईतील वरळी येथून पिंपळगाव लांडगा येथे आलेला 62 वर्षीय व्यक्ती, विक्रोळी (मुंबई) येथून संगमनेर येथे आलेली 68 वर्षीय महिला आणि घोरपडी (पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेला 32 वर्षीय युवक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या आतापर्यंत एकूण 16 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत.
दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाने दोन हजार 65 स्त्राव चाचणी नमुने तपासले असून, त्यापैकी एक हजार 922 नमुने निगेटिव्ह आले आहेत. दहा व्यक्तींचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. 40 नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद येथून मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा आकडा वाढत असून, शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. परजिल्ह्यांतून आलेले नागरिकांना गावा-गावांत शाळेतच विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे.
मात्र, काही नागरिक गावात फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आतापर्यंत 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या नगर येथे 26, तर नाशिक येथे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सात आणि बाहेरील जिल्ह्यांतील एक, असे आठ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.