सासवड/जेजुरी – गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात साबळे-वाघिरे व्यवसाय समूह छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून बिडीचे उत्पादन करत आहे. राष्ट्रपुरुषांचे नाव वापरून तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन बंद करावे, या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर किल्याच्या पायथ्याशी उपोषण सुरू केले होते. मात्र, हे उपोषण मंगळवारी (दि. 8) माघारी घेऊन राज्यभर साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत.
फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, मच्छिंद्र टिंगरे, रवी पडवळ, दिनेश ढगे, सागर पोमण, सुनील पालवे यांनी पुरंदर किल्याच्या पायथ्याशी शुक्रवारी (दि. 4) पासून उपोषण सुरू केले होते. तर मंगळवारी पहाटे 1 वाजता सासवड पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर उपोषणकर्त्यांना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
पुरंदर तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी मंगळवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. या शिवाय तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. यावर उपोषण कर्त्यांनी साखळी आंदोलनाची घोषणा करून उपोषण मागे घेतले. तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडले. मात्र, हे नाव जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात साखळी आंदोलन करण्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशन व इतर पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी दिला आहे.
- आंदोलनाची दिशा
मंगळवारी (दि. 15) : संभाजी बिडी या उत्पदानवर बहिष्कार
मंगळवारी (दि. 22) : साबळे-वाघिरे कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा
मंगळवारी (दि. 29) : महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार आमदार यांना घेराव
मंगळवार (दि. 6 ऑक्टोबर) : रोजी राज्यभर रास्तारोको