पुणे (प्रभात वृत्तसेवा) – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. काही महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी, पालक यांची गर्दी होत असल्याचे आढळून आले आहे. आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येकाने प्रवेश निश्चित करावे, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी जारी केले आहेत.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. पहिली नियमित प्रवेश फेरी संपली असून आता दुसऱ्या नियमित फेरीची प्रक्रिया सुरु आहे. डेटा प्रोसेसिंगसाठी आता प्रवेश अर्जाचा भाग-1 व भाग-2 भरण्यासी सुविधा बंद करण्यात आलेली आहे. पुढील प्रवेश फेरीसाठी 11 सप्टेंबरपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी व त्यात बदल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्यक्ष प्रवेश व डीजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. महाविद्यालयात विनाकारण प्रवेशासाठी गर्दी होऊ लागलेली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव महाविद्यालयांमध्ये गर्दी होता कामा नये. वेळोवेळी जाहीर केलेल्या कार्यपध्दतीनुसार प्रवेश ऑनलाईनच निश्चित करता येतील अशा सुविधा महाविद्यालयांनी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालकांना पाठविलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
प्रवेशासाठी आवश्यकतेप्रमाणे कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करावी. इतर अनावश्यक माहिती अर्ज भरणे, अनावश्यक कागदपत्रांचा आग्रह धरणे टाळावे, प्रवेश नाकारताना त्याबाबत संपूर्ण खात्री करुन स्पष्ट कारणे नमूद करावी लागणार आहे. चूकीच्या अथवा पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार नाही. याबरोबरच पात्र विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
प्रवेशाची नियमावली सर्वांनी समजून घ्यावी. विद्यार्थ्यांचा प्रवेश सुलभ होईल यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र, कनिष्ठ महाविद्यालये, पालक यांनी समन्वय साधून विद्यार्थ्यास प्रवेशासाठी मदत करावी लागणार आहे.